संदीप राक्षे
सातारा – करोनाच्या काळात रखडलेल्या करवसुलीमुळे आर्थिक ओढाताण होऊ लागल्याने सातारा नगरपालिकेने घरपट्टी व पाणीपट्टीची बिले नागरिकांना देण्यास सुरवात केली आहे. त्यातून पाच दिवसांत पालिकेकडे 18 लाखांचा महसूल जमा झाला आहे.
करोनामुळे शासनाने घरपट्टी माफी देण्याबाबतचा प्रस्ताव सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी करून पाठवावा, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. मात्र, उदयनराजे यांची सत्ता असणाऱ्या सातारा पालिकेने नागरिकांना नगरपालिका अधिनियम 150 प्रमाणे घरपट्टी, नळपट्टीचे बिलवाटप सुरू केले आहे. पालिकेच्या गंगाजळीला बळकटी देणाऱ्या घरपट्टीच्या महसुलापासून ते रखडलेल्या चतुर्थ वार्षिक पाहणीपर्यंतचा वेध घेणारी वृत्तमालिका आजपासून…
सातारकरांच्या मागण्यांच्या अनुषंगाने अनेक विधाने खासदार उदयनराजे भोसले सातत्याने करत असतात. शासनाने घरपट्टी माफ करावी या उदयनराजे यांच्या विधानाला फार काळ लोटलेला नाही. मात्र, उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या सातारा पालिकेने तब्बल पस्तीस हजार घरपट्टीची तर दहा हजार नळपट्टीची बिले तयार ठेवली आहेत.
करोना संक्रमण काळातही घरपट्टी वसुलीला सातारकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून गेल्या पाच दिवसांत तब्बल 19 लाखांचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. शहराचा सर्वात मोठा प्रभाग समजल्या जाणाऱ्या शनिवार पेठेत या बिलांचे वाटप झाले असून मंगळवार पेठेत या बिलांचे 80 टक्के वाटप झाले आहे.
नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 150 (क) प्रमाणे घरफळा, पाणीपट्टी व जकात वसुल करणे हे स्थानिक स्वराज्य संस्थांची मूलभूत कामे मानण्यात आली आहेत. मात्र राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासन यामुळे पालिकेच्या जनरल फंडाचे कंबरडे कायमच मोडलेले असते.
थकबाकीचा आकडा 29 कोटींवर पोहचला असून शहरातील 35 अधिक बड्या खातेदारांची थकबाकी कोर्टकचेऱ्यांच्या तारखात आहे. त्यातच 23 मार्चपासून झालेल्या लॉकडाऊनचा फटका पालिकेच्या महसुलाला बसल्याने 23 टक्के झालेल्या वसुलीला दोन महिन्यांसाठी ब्रेक लागला. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दंडवसुली वगळता अनामत शुल्काचे केवळ तीनशे रुपये खजिन्यात जमा झाले होते.
सरकारी अनुदानाची वाट पाहण्याच्या निमित्ताने सफाई कामगारांचे पगार व ठेकेदारांच्या देयकांचे तीन कोटी अडकून पडल्याने विकास कामांना मोठा फटका बसला आहे. साधारण 33 हजार मिळकती व साडेबारा हजार नळ कनेक्शन सातारा शहरात आहेत.
यंदा पालिकेने राजकीय अभिनिवेष बाजूला ठेवून घरपट्टी वसुलीच्या कामाला गती दिल्याने घरपट्टीचा ओघ सुरू झाला असून पाच दिवसांत साधारण 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोबत नळपट्टीची स्वतंत्र बिलेसुध्दा दिली जात असून करोनाच्या सर्वेक्षणाबरोबर बिलांचेही वाटप शहराच्या पश्चिम भागातून सुरू झाले आहे. घरपट्टीचे निर्धारण करणारी चतुर्थ वार्षिक पाहणी मात्र आणखी एक वर्ष पुढे ढकलण्याचा प्रस्ताव वसुली विभागाकडून दिला गेल्याने पुन्हा आश्चर्य व्यक्त होत आहे.