जम्मू – पाक व्याप्त काश्मीरमधील नागरिकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी ते भारताकडून मदतीची अपेक्षा करत आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले आहे.
पाकिस्तान सातत्याने भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत राहिला आहे. मात्र हे प्रयत्न आपल्या सुरक्षा रक्षकांनी आणि देशभक्त नागरिकांनी निष्फळ ठरवले आहेत. पाकिस्तानने 1947 मध्ये काश्मीरवर हल्ला केल्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लेहचा मोठा भूभाग पाकिस्तानच्या ताब्यामध्ये गेला आहे.
याचा पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे. पाकिस्तानच्या जाचापासून सुटका मिळण्यासाठी त्यांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. त्यासाठी भारताने त्यांची मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा असल्याचे होसबाळे यांनी सांगितले.
पाकिस्तानने एकट्या मीरपूर शहरात 20 ते 25 हजार लोकांना ठार मारले. इतर भागातही असेच अत्याचार केले गेले, असे ते म्हणाले. नवीन पिढ्यांनी देशभक्तांच्या बलिदानाचे स्मरण करावे आणि भारताला महान बनविण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.