– संतोष वळसे पाटील
तालुक्यात डेंग्यू, टायफॉईड इत्यादी रोगांनी धुमाकूळ घातला आहे. गावागावांत साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. खासगी दवाखाने रुग्णांनी “हाऊसफुल्ल’ असून, वैद्यकीय उपचार अभावामुळे आरोग्य विभाग सुस्त आहे. खासगी दवाखान्यात येणाऱ्या वैद्यकीय बिलावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने मनमानी वाढल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे.
मंचर, घोडेगाव, अवसरी खुर्द, पारगाव कारखाना इत्यादी गावांनी डेंग्यू, तसेच विविध साथीच्या आजारांनी रुग्ण त्रस्त झाले आहेत. गावागावांत पाऊस झाल्याने गवत वाढले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्थित व्यवस्था नसल्याने पाण्याची डबकी साचली आहेत. रात्रीच्या वेळी मच्छरांचा इतका प्रादुर्भाव वाढला की बाहेर अंगणात बसणे नागरिकांना अवघड झाले आहे. आरोग्य विभागाकडून प्रभावी योजना होत नाही.
आरोग्य उपकेंद्रात किरकोळ पद्धतीच्या गोळ्या उपलब्ध आहेत; परंतु डेंग्यू, टायफॉईड सारच्या आजारांवर उपचार होत नाहीत. तसेच रक्ततपासणी किंवा इतर तपासण्यांची प्रभावी यंत्रणा आरोग्य केंद्रात नाही.
खासगी प्रयोगशाळा आणि खासगी डॉक्टरांकडे वैद्यकीय उपचाराशिवाय रुग्णांना पर्याय नाही. गरीब आणि गरजू रुग्ण आर्थिक विवंचनेअभावी अंगावर दुखणे काढून मृत्यूला सामोरे जात आहेत. गावागावांत असणाऱ्या ग्रामपंचायती आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने विविध साथीच्या आजारांचे उच्चाटन होणे गरजेचे आहे; परंतु विधानसभा निवडणुकीत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मशगुल असल्याने रुग्णांकडे कोणाचेही लक्ष नाही. यासाठी समन्वयाने काम होऊन गरीब आणि गरजू रुग्णांना दिलासा देऊन खासगी डॉक्टरांनी रुग्ण सेवेचा वसा जपणे गरजेचे आहे.