जनसमस्यांसाठी जनसंवाद क्षेत्रीय कार्यालर्यांमध्ये चर्चा
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आल्यापासून दर सोमवारी सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा घेतल्या जात आहेत. या सभांमध्ये नागरिक आपल्या समस्या मांडत आहेत तर काहीजण समाधानही व्यक्त करत आहेत. तिसऱ्या जनसंवाद सभेत ठिकठिकाणी वेगवेगेळ् प्रकार पहावयास मिळाले. काही ठिकाणी आंदोलने, निषेध तर वेगवेगळ्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत.
पिंपरी -नागरिकांना कान पिचक्या तर अधिकाऱ्यांना समज देत “अ’ प्रभागातील जनसंवाद सभा पार पडली. या वेळी नागरिकांच्या प्रश्नांनी उत्तरे व समाधान समन्वयक म्हणून तथा सहशहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी केले.
“अ’ प्रभागातील जनसंवाद सभेत 18 तक्रार अर्ज प्राप्त झाले. त्यांचे समाधान करत व संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना देण्यात आल्या. या वेळी सर्वाधिक प्रश्न हे पाणी, विद्युत, स्थापत्य, आरोग्य या विभागांशी संबंधित होते. तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, ड्रेनेज, गटार तुंबणे, उघडी गटारे, कचरा, पाणी या विषयांवर सर्वाधिक प्रश्न होते. तसेच नागरिकांनी आपली जबाबदारी स्वीकारावी, सर्वच कामे एकटी महापालिका करू शकणार नाही, असेही सांगितले.
पहाटे पाणी पुरवठा, तोही दूषित
विद्यानगर परिसरात पहाटे 1.45 वाजता आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. त्या वेळी तेथे अनेकांनी अनधिकृत नळजोड घेतले आहेत. ते घेताना दक्षता न घेतल्याने असे होत असावे, असे सांगून अनधिकृत जोडांवर कारवाई केल्यास हा प्रश्न सुटेल, असे सांगण्यात आले.
आरोग्य विभागाचे अधिकारी अनुपस्थित
केंद्र आणि राज्य सरकारचे स्वच्छाग्रहीचे पथक शहरात दोन दिवस आहे. त्यांच्यासोबत आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी असल्याने जनसंवाद सभेत ते अनुपस्थित होते. त्यामुळे या प्रश्नांवर चर्चा झाली नाही.
सभेचा जाहीर निषेध
असंघटित कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शाखेतर्फे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 19 नगर मधील पत्राशेड पुनर्वसन प्रकल्प, निराधार नगर झोपडपट्टी पुनर्वसन, शगुन चौक अतिक्रमण कारवाई थांबवणे, तसेच इंदिरा गांधी उड्डाणपूल हे विषय सलग 3 जनसंवाद सभेत मांडले. मात्र, सभेला संबंधित विभागाचे कर्मचारी अनुपस्थित होते. त्यामुळे समन्वयकांनी केवळ मध्यस्थिती भूमिका घ्यायची का? असा प्रश्न उपस्थित करत जनसंवाद सभेचा जाहीर निषेध केला व सभागृहातून बाहेर पडले.