वारजे-माळवाडी – महापालिकेच्या हद्दीत जमा होणारा घनकचरा उचलण्याची सक्षम व्यवस्था असताना पुणे शहराच्या अनेक गृहनिर्माण वसाहतींमध्ये घनकचरा, झाडांचा पालापाचोळा नाहीसा केला जात आहे. हा कचरा जाळला जात असताना निर्माण होणाऱ्या धुराने नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र ना महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांना नागरिकांच्या आरोग्याची पर्वा आहे, ना पर्यावरण रक्षणाच्या गप्पा मारणाऱ्या कोणा स्वयंसेवी संस्थेला हवेच्या गुणवत्तेची काळजी आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची वाहने वारजे माळवाडी भागात कचरा गोळा करत असतात. मात्र, खासगी अथवा सार्वजनिक जागेतल्या झाडांचा जो पालापाचोळा पानगळीच्या हंगामामुळे पडतो, त्याच्या विल्हेवाटीची कोणतीही यंत्रणा मनपाकडे नाही. हा कचरा वाहून नेला जात नसल्याने अनेकदा नागरिकांना अथवा सोसायटीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनाच त्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती केली जाते. हे कर्मचारी अनेकदा हा कचरा पेटवून नाहीसा करण्याचा मार्ग स्वीकरतात; ज्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार, खोकला, डोळ्यांची जळजळ अशा तक्रारींना सामोरे जावे लागते.
पॉप्युलरनगरमध्येही असेच चित्र असून अनेकदा माळवाडीमधील नागरिक स्वत:च्या हद्दीत सुका पालापाचोळा पेटवून देतात. त्यामुळे नागरिकांना घराची दारे-खिडक्या बंद करुन बसावे लागते. याविषयी महापालिकेकडे तक्रार केली असता, तात्पुरती कारवाई केली जाते आणि अधिकाऱ्यांची पाठ फिरताच पुन्हा कचरा जाळणे सुरुच रहाते. अशा स्थितीत नागरिकांना नक्की कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न पॉप्युलरनगरचे नागरिक विचारत आहेत. माजी नगरसेवकही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावरुन वाहणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नानेही नागरिक हैराण झाले आहेत.