प्राधिकरणाचा कारभारच वाकडा
कितीही आश्वासने दिली तरी प्राधिकरणाचा कारभार हा कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे वाकडाच असल्याचा अनुभव येत आहे. शाहूपुरी, सदर बझार, पीरवाडी, खेड, गोडोली, जगताप वाडी या भागांना प्राधिकरण पाणी पुरवठा करते. ठेकेदाराचे कर्मचारी मीटर रीडिंगसाठी जाऊन केवळ दहाच घरांचे रीडिंग घेतात. पुढील घरांच्या बिलांवर सरसकट “लॉक’चा शिक्का मारला जातो. त्या ग्राहकांना एकदम चार महिन्यांची बिले पाठवली जातात, असा आरोप नागरिकांनी केला. मुजोर ठेकेदाराला प्राधिकरणाकडून जाब विचारला जात नाही, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया गोडोलीतील रहिवासी रवी पवार यांनी दिली.
सातारा – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ठेकेदार यंत्रणेकडून येणाऱ्या अंदाजपंचे बिलांमुळे गोडोली, गोळीबार मैदान व शाहूपुरीतील ग्राहकांना फटका बसला आहे. बिलावर “लॉक’ असा शेरा पडल्यावर बिल पाच हजार रुपयांवर जात असल्याने ग्राहक डोक्यावर हात मारून घेत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मंगळवारी प्राधिकरण कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
जीवन प्राधिकरणाच्या कारभाराला कशाचाच धरबंद नाही. बिलमोजणीचे काम कराडच्या ठेकेदाराकडे आहे. बिलामध्ये मीटर रीडिंगच्या रकान्यात आकडे भरायचे सोडून “घर बंद’ असल्याचा शेरा देण्यात येत असून एकदम चार महिन्यांची अंदाजपंचे बिले देण्याची अजब पद्धत अवलंबली जात आहे. मीटर रीडिंग घेणाऱ्यांवर कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांचे नियंत्रण नाही. गेल्या आठ दिवसांत शिवनेरी सोसायटी, गोडोली गावठाण, गोळीबार मैदान कृष्णकुंज सोसायटी, विश्वकर्मा सोसायटी येथील नागरिकांना तीन-तीन हजार रुपयांची पाणी बिले आल्याने त्यांचा संताप झाला.
त्याचा मंगळवारी उद्रेक झाला. रवी पवार, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, कांतिलाल कांबळे, अश्रफ इनामदार यांच्यासह पन्नास नागरिकांनी सकाळी प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. मनमानी बिले करणाऱ्या ठेकेदाराच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात आला. सहाय्यक अभियंता सौ. गडकरी यांची भेट घेऊन नागरिकांनी आपल्या त्रासाचा पाढा वाचला. पाणीबिले सर्रास चुकीची येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सौ. गडकरी यांनी चूक मान्य करून काही बिले तेथेच दुरुस्त करून दिली आणि 1 डिसेंबरपासून दोन महिन्यांची बिले पाठवली जातील, असे आश्वासन दिले.