कार्यालयांमध्ये फक्त अधिकारी, कर्मचारीच; करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
सातारा (प्रतिनिधी) – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून अतितातडीचे काम असेल तरच जिल्हा परिषदेत यावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी केले होते. त्यानुसार गुरुवारपासून जिल्हा परिषदेत नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला. करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाच्यावतीने हे पाऊल उचलण्यात आले असून कार्यालयात फक्त अधिकारी, कर्मचारीच असणार आहेत. नागरिकांनी इ मेल, दूरध्वनीद्वारे संबंधित विभागाशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन भागवत यांनी केले.
महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र सावधानता बाळगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू केला आहे. संसर्गाने करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारचे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
जिल्हा परिषदेत होणारी गर्दी टाळण्यासठी दि. 31 मार्चपर्यंत अतितातडीचे काम असेल तरच अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे. जिल्हा स्तर व क्षेत्रीय स्तरावर सर्वसामान्य जनतेने शासकीय कार्यालयात न जाता मेलद्वारे अर्ज करुन माहिती प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी अधिकारी, कर्मचारी कार्यालयात दाखल झाल्यानंतर सर्व कार्यालयांना कुलूप लावण्यात आले. नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली. अचानक प्रवेश बंदीचा निर्णय झाल्याने विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली.
जिल्हा परिषदेत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उपस्थित नागरिकांनी गोंधळ घातल्याने आवश्यकतेनुसार प्रवेश देण्यात आला. दुपारनंतर मात्र सर्व प्रवेश बंद करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारावर काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करुन नागरिकांची निवेदने त्याचठिकाणी स्वीकारण्यात येत होती. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी केले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषदेत नागरिकांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. अतितातडीचे काम असेल तर संबंधित विभागाशी संपर्क साधायचा आहे. करोना संसर्गातून फैलावत असून प्रशासनाने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयांमुळे नागरिकांनी काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेऊन या संकटाचा सामना करण्याच्या कामात सहभागी होण्याची गरज आहे.
संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.