राजगुरूनगर – सिनेमाच्या माध्यमातून पोलीस पाटलाला खलनायक बनवले आहे. मात्र हे चित्र आता बदलले आहे. पोलीस पाटील हे उच्चशिक्षित बनले आहेत. भविष्यात पोलीस पाटलांना चांगले दिवस येतील, असे प्रतिपादन राज्य पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदेपाटील यांनी केले.
खेड तालुका पोलीस पाटील संघटनेचा पदग्रहण, सेवापूर्ती व विशेष कामगिरी सन्मान सोहळा समारंभ येथील पंचायत समितीच्या सभागृहात आज (दि. 7) झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते पोलीस पाटलांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, राजगुरुनगर सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष सागर पाटोळे, जिल्हाध्यक्ष गोरक्ष नवले कार्याध्यक्ष राळे, महिला जिल्हाध्यक्ष तृप्ती मांडेकर, तालुकाध्यक्ष अशोक चौधरी, उपाध्यक्ष आत्माराम डुंबरे, संदीप भागडे, सुरेश दौंडकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील स्व. सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
बाळासाहेब शिंदे म्हणाले, ज्या गावात भांडणे नाही ते गाव सुखी असते. गावातील भांडणे गाव पातळीवर सोडविण्याची जवाबदारी पोलीस पाटलांची असते. पोलीस पाटलांचे वय 60 वरून 65 करावे याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांच्यासह डिजीकडे मागणी केली त्यावर चर्चा केली. इतरही प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे.
ऍड. पोपटराव तांबे म्हणाले, पाटीलकीसह स्वतःचे चारित्र्य टिकवून ठेवले पाहिजेच; परंतु पाटलासारखे वागले पाहिजे. गाव एकसंघ ठेवण्याचे काम पाटील करतो. लोकांचा विश्वास पाटलांवर असतो त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.
अरविंद चौधरी म्हणाले, पोलीस पाटील गावाचा मुखीया असतो. प्रतिष्ठा, गावात व परिसरात त्यांनी महत्व निर्माण करणे गरजेचे आहे. गावात तंटे होणार नाहीत याची काळजी घ्यावी. गावातील सामाजिक सुरक्षा अबाधित राखावी. अन्याय झालेला आणि अन्याय करणारा याबाबत पोलिसांना माहिती द्यावी.
पोलीस पाटलांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण करून काम केले पाहिजे. पोलीस पाटलाकडे न्याय झाला पाहिजे. येणाऱ्या काळात पोलीस पाटीलपद मानाचे आणि महत्वाचे होणार आहे. अलीकडे समाज बदलत आहे. समाजाचे वास्तव पाहून त्यांनी काम करावे. आगामी विधानसभा निवडणुकीत काम करताना निपक्षपणे करावे. ग्राम सुरक्षा दलाला सतर्क ठेवणे गरजेचे आहे.
-गजानन टोम्पे, पोलीस उपाधीक्षक