दुबई – बायोबबलचा भंग केल्यामुळेच ख्रिस गेल याला आयपीएल स्पर्धेतील उर्वरित सामन्यांतून डच्चू देण्यात आल्याचे पंजाब किंग्ज संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे. गेल्या वर्षापासून गेल विविध स्पर्धांमध्ये खेळत असताना बायोबबलमध्ये होता. त्याला आगामी विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठी सज्ज व्हायचे असल्याने त्याला काही काळ बायोबबलमधून बाहेर राहायचे असल्यानेच त्याने आयपीएल बायोबबलमधून बाहेर पडण्याचे निश्चित केले.
या निर्णयामागे इतर कारणे असू शकतात, असेही सांगितले जात आहे. पंजाब किंग्ज संघाने गेलला त्याच्या 42 व्या वाढदिवसाच्या दिवशीच झालेल्या सामन्यात अंतिम 11 खेळाडूंमधून वगळले होते. मात्र, त्यामुळेच तो नाराज झाला होता.
गेल आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना खेळला नाही. मात्र, त्याने पुढील दोन सामन्यांमध्ये पुनरागमन केले. दोन्ही सामन्यांमध्ये गेल फार काही सरस कामगिरी करू शकला नाही आणि त्याने या सामन्यांमध्ये 14 आणि 1 अशा धावा केल्या.
पंजाब संघात त्याला चांगली वागणूक दिली जात नव्हती. पंजाबने गेलला त्याच्या कठीण काळात साथ द्यायला हवी होती. ख्रिस गेल हा गेम चेंजर आहे. जर तो संघात नसेल तर शंभर टक्के मोठे नुकसान आहे. मला माहीत नाही की तो संघात आहे की नाही. त्याला संघाबाहेर ठेवण्यामागे काय विचार होता हे मला कळलेले नाही, असे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले आहे.
सततच्या बायोबबलला कंटाळला…
गेल सातत्याने एक बायोबबलमधून दुसऱ्या बबलमध्ये प्रवास करतोय. त्यामुळे त्याला थकवा जाणवत होता. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि आराम करण्यासाठी त्याने आयपीएल सोडले आहे, असेही सांगितले जात आहे. नुकत्याच संपलेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगच्या बबलमधून त्याने आयपीएलच्या बायोबबलमध्ये प्रवेश केला होता. कोरोनाच्या नियमानुसार संघातील सर्व खेळाडूंना नियमांचे पालन करावे लागत आहे.