नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर राहुल गांधी हे अजूनही ठाम आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी आज अहमद पटेल आणि के सी वेणुगोपाल या पक्षाच्या दोन प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली त्यावेळी माझ्या ऐवजी दुसरा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरू करा असा आदेश त्यांनी या प्रतिनिधींना दिला असल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान आज राहुल गांधी यांनी पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनाहीं भेटण्यास नकार दिला. त्यांच्या पुढील दोन दिवसांच्या अपॉईन्टमेंट्स आणि कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.
आज पंडित नेहरुंची पुण्यतिथी होती. त्यानिमीत्त त्यांनी आज निवडणूक निकालानंतरचे पहिले ट्विट केले. त्यात त्यांनी नेहरूंचे स्मरण करताना म्हटले आहे की भारतासारखे अनेक देश नंतर हुकुमशाहींकडे वळले पण पंडित नेहरूंनी केलेल्या देशाच्या भक्कम पायाभरणीमुळे आणि संस्थात्मक उभारणीमुळे देशात 70 वर्ष लोकशाहीं टिकून राहिली.
राहुल गांधी यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीतच राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पण पक्षाने त्यांचा राजीनामा एकमताने फेटाळला आहे. तथापी राहूल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद अजून सोडलेले नाही. पक्षाला नवीन अध्यक्ष शोधण्यासाठी काही वेळ देण्याची त्यांची तयारी आहे. पण अध्यक्षपदावर मात्र आता ते राहु इच्छित नाहींत हे जवळपास निश्चीत मानले जात आहे.