राजगुरूनगर -विद्यार्थ्यांनी संधी स्वीकारावी आणि सतत स्पर्धा करावी. आपले करिअर घडवत असताना कुठल्याही भूलथापांना बळी पडू नये, जो मार्ग निवडला आहे त्यावरच स्थिर राहावे, असे प्रतिपादन प्रा. अनघा अग्रवाल यांनी केले.
हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या रत्नाई महाविद्यालयात “आजीवन अध्ययन व विस्तार विभाग’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांशी करिअरच्या संदर्भात मार्गदर्शन करत असता “विद्यार्थ्यांनी संधी स्वीकारायला हवी’ असे मत प्रा. अग्रवाल यांनी कार्यक्रमात व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, संस्थेच्या खजिनदार सुरेखा मोहिते पाटील, “अंनिस’च्या जिल्हा संघटक ऍड. साधना बाजारे, ऍड. संजय गोपाळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, उपप्राचार्य किशोर भागवत, वामन गव्हाणे, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून झाली.
प्रा. अनघा अग्रवाल म्हणाल्या, प्रत्येक क्षेत्रात संधी ठेवलेली असते; परंतु ती स्वीकारण्यास आपण अपात्र ठरावे, यासाठी आपल्या कार्यात सातत्य हवे. स्पर्धा परीक्षा गंभीर स्वरूपाच्या असल्या तरी त्यात आपण यश संपादन करू शकतो, आपल्यासारखे आपणच असतो, कुठलीही गोष्ट मिळवणं आपल्याला शक्य असते.
ऍड. संजय गोपाळे यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. “वित्तीय साक्षरता’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. संजय गिरी व डॉ. परमेश्वर गडकर यांनी सांगितले की, “पैसा खुदा नहीं, लेकिन खुदासे कम भी नहीं’ मोलाचा संदेश देऊन मार्गदर्शनाची सांगता केली.
या व्याख्यानमालेचे आयोजन आजीवन अध्ययन व विस्तार विभाग समन्वयक प्रा. व्ही. एस. जाधव, प्रा. एस. बी. रणखांबे यांनी केले. सूत्रसंचालन नीशा पंडित हिने केले, तर प्रा. एस. जी. मूळूक यांनी आभार मानले.