कोल्हापूर,- – “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याचे भाषण केले नाही, त्यांनी शिमग्याचे भाषण केले. इतर प्रश्नांवर न बोलता केवळ भाजप हाच मुद्दा घेऊन ते विरोधकांना शिव्या-शाप देण्याची भाषा करत होते, असा पलटवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान ‘हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही’ अस म्हणत शिवसेनेवर टीका ही केली.
पाटील म्हणाले, भाजपची केवळ एकच भूमिका राहिली आहे. ‘हम किसी को टोकेंगे नही, कोई टोकेगा तो छोडेंगे नही’. कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण हिंदुत्ववादी असल्याचे ढोंग करत आहे, हे जनतेला समजत आहे. येणाऱ्या निवडणुकीत ते जनता दाखवून देईल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा काय होती, हे त्यांनी विचार केला पाहीजे. दसरा मेळाव्यात जनतेच्या प्रश्नावर ते बोलले नाही. पण, भाषणाचा मुद्दा फक्त भाजप होता. हे त्यांनी दाखवून दिले, असे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल पदाची प्रतिष्ठा राखली नाही, मग इतर मुख्यमंत्री का राखतील, असा सवाल देखील पाटील यांनी केला.