मुंबई – आम्ही पालघर साधू हत्याकांड अद्यापही विसरलेलो नाही. चित्रगुप्तानेही पाप-पुण्याचा हिशेब मांडताना महाविकासआघाडीला शाप दिले असतील. किमान आता तरी या अहंकारी सरकारला सद्बुद्धी यावी, अशी टीका भाजप आमदार राम कदम यांनी केली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे आजपासून खुली झाली आहेत. यानिमित्ताने राम कदम यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रातील जनतेने आज सरकारच्या मुस्काटात लगावली आहे. अटी घालून मंदिरे उघडायची होती तर आधी करता आले नसते का? भक्तांनी आणि महाराष्ट्रातील लोकांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी. त्यांनी महाविकासआघाडी सरकारला कदापी माफ करू नये, असे राम कदम म्हंटले आहेत.
तसेच भाजपला पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचा विसर पडला नसून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आज चित्रगुप्त पाप-पुण्याचा हिशेब लिहत असले तर तोदेखील महाविकासआघाडी सरकारला यासाठी शाप देईल, अशी टीका राम कदम यांनी केली.