सातारा -जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्याकडे पोलीस गांभीर्याने पाहत नाहीत, असा आरोप करत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल (दि. 25) गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांना लक्ष्य केले होते.
संशयितांना सोडणार नसल्याचे गृह राज्यमंत्री सांगत असले, तरी कोणाला पकडले ते त्यांनी सांगावे, असे त्या म्हणाल्या होत्या. या आरोपांचे खंडन ना. शंभूराज देसाई यांनी रविवारी केले. चित्रा वाघ यांचे म्हणणे आपण गांभीर्याने घेत नाही, अशी कोपरखळी त्यांनी मारले. वाघ यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास केवळ सातारा नव्हे तर राज्यातील पोलीस चांगल्या पद्धतीने करत असल्याचे त्यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे उपस्थित होते. ना. देसाई म्हणाले, महाबळेश्वरला घडलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने चित्रा वाघ यांनी माझ्यावर आणि जिल्हा पोलीस दलावर आरोप केले आहेत.
वाघ या सांगत असलेली परिस्थिती आणि वस्तुस्थिती यात तफावत आहे. कोणत्याही गोष्टीवर बोलण्यापूर्वी वाघ यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत घडलेल्या घटनांमध्ये अपवाद वगळता संशयितांना पोलिसांनी अटक केल्याचे सत्य आहे; परंतु केवळ राजकीय मानसिकतेतून वाघ या माझ्या व पोलिसांच्या कार्यपद्धतीवर शंका घेत आहेत.
जिल्हा पोलीस दलानेच नव्हे, तर राज्य पोलीस दलाने महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या तपासात चांगली कामगिरी केल्याने भाजप सरकारच्या काळापेक्षा महाविकास आघाडी सरकारच्या काळात या गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे. महाबळेश्वर प्रकरणात ज्यांचा ज्यांचा सहभाग तपासात दिसून येईल, त्या प्रत्येकावर गुन्हे दाखल केले जातील.
उत्पादन शुल्कच्या विरोधात तक्रारी आल्यास कारवाई करू
जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभागाची कार्यपद्धती अत्यंत चुकीची आहे. हा विभाग केवळ कारवाईचा देखावा करण्यात धन्यता मानत आहे. याबाबत विचारले असता, ना. देसाई म्हणाले, उत्पादन शुल्क विभागाबाबत काही तक्रारी असतील, तर संबंधितांनी माझ्याशी संपर्क करावा. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल.