नवी दिल्ली – भारताचे युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांनी वैद्यकीय कारणाने सुदिरामन करंडक मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
फिनलंड येथे 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या
स्पर्धेत भारताच्या 12 खेळाडूंच्या संघात चिराग-सात्विक या जागतिक क्रमवारीत 10व्या स्थानावरील जोडीचा समावेश होता. मात्र, चिराग अद्याप आजारपणातून सावरला नसल्यामुळे या जोडीला माघार घ्यावी लागत आहे.
सुदिरामन स्पर्धेनंतर होणाऱ्या थॉमस चषक स्पर्धेतही या जोडीच्या सहभागाबाबत शंका निर्माण झाली आहे. चिराग-सात्विकच्या अनुपस्थितीत ध्रुव कपिला आणि एमआर अर्जुन जोडीवर भारताची दुहेरीत मदार आहे.
भारतीय संघात किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणित, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी, मालविका बनसोड, अदिती भट, तनिशा क्रॅस्टो, ऋतुपर्ण पांडा यांचा समावेश आहे.