पाटणा – बिहारमध्ये कधीही विधानसभा निवडणूक होऊ शकते, असे भाकीत लोक जनशक्ती पक्षाचे (लोजप) अध्यक्ष चिराग पासवान यांनी शनिवारी केले. ते भाकीत अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याला अवघ्या पंधरवड्याचा कालावधी उलटला आहे. अशात चिराग यांनी केलेले वक्तव्य सगळ्यांनाच चकित करणारे ठरले आहे. नव्या सरकारचे चाललेले कामकाज पाहता केव्हाही नव्याने निवडणूक घेण्याची वेळ येऊ शकते, असे ते येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचा समावेश असणाऱ्या एनडीएला सत्ता राखण्यात यश आले. मात्र, त्या आघाडीला काठावरचे बहुमत मिळाले. यावेळी आघाडीतील समीकरणे बदलली आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला संख्याबळात मागे टाकून भाजप सत्तारूढ आघाडीत मोठा पक्ष बनला आहे.
अधिक जागा मिळूनही भाजपने मुख्यमंत्रिपदावर दावा केला नाही. मात्र, आता सरकारच्या कामकाजात भाजपच्या शब्दाला मोठे वजन राहणार आहे. त्यातून सत्तारूढ आघाडीत धुसफूस होऊ शकते, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, चिराग यांचे वक्तव्य चर्चेचा विषय ठरणार आहे.