मुंबई – सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्या लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर बारीक अक्षरात नाव छापल्याने केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंपेक्षा राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मीच सीनियर असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे.
नारायण राणे यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. माणसाने संकुचित किती असावे बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापले आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझे नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकले आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचे नाही. माझं नाव बारीक का झाले हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असे राणे म्हणाले.
यावेळी त्यांनी सिंधुदुर्गाचा विकास आपणच केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच चिपी विमानतळाचे कामही आपणच मार्गी लावल्याचा दावा त्यांनी केला. 1990 मध्ये पहिल्यांदा मी सिंधुदुर्गातून आमदार झालो. रस्ते नव्हते, डांबरीकरणाचा पत्ता नव्हता, शैक्षणिक सुविधा नव्हत्या. जिल्ह्यात भात सोडला तर दुसरं पिक नव्हतं. गरीबी होती. ऊदरनिर्वाहासाठी औद्योगिकीकरण नव्हतं. दरिद्री जिल्हा म्हणून संबोधलं जायचं.
त्यावेळी जिल्ह्याच्या विकासासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्या जिल्ह्याचा विकास कसा करता येईल, त्यासाठी टाटा कंपनीकडे गेलो. टाटांनी काही महिन्यानंतर रिपोर्ट दिला. सिंधुदुर्गाच्या विकासाची ती ब्लू प्रिंटच होती. पर्यटनानेच हा जिल्हा विकसित होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. ते समजल्यानंतर मी जिल्ह्याच्या पर्यटनासाठी प्रयत्न केले असे ते म्हणाले.