नवी दिल्ली -पूर्व लडाखमधील पेंगॉंग तलावाच्या फिंगर-4 भागातून माघार घेण्यास चीनी सैन्याने सुरूवात केली आहे. त्याशिवाय, तेथील तात्पुरत्या छावण्या आणि बांधकामेही चीनी सैन्याकडून हटवली जात आहेत.
मागील वर्षी कुरापती करत चीनी सैनिकांनी सीमेची म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेची (एलएसी) जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली. तो तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारत आणि चीनमध्ये लष्करी तसेच राजनैतिक पातळ्यांवर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. चर्चेत सैन्यमाघारीविषयी सहमती दर्शवणारा चीन प्रत्यक्षात शब्द पाळत नव्हता. त्यामुळे अनेक महिने तणावाची स्थिती कायम राहिली. अखेर मागील आठवड्यात चीनने नरमाई दाखवत सैन्यमाघारीचे पाऊल उचलले.
त्या प्रक्रियेला आता वेग आला असून चीनी सैन्य महत्वाच्या ठिकाणापासून हटत आहे. दोन्ही देशांत झालेल्या सहमतीनुसार चीनी सैन्य फिंगर-8 भागापर्यंत मागे जाणार आहे. त्या भागापर्यंत आमची हद्द असल्याची भारताची रास्त आणि ठाम भूमिका आहे. त्याउलट, चीनने फिंगर-4 भागापर्यंत आपला दावा सांगितला होता. आता त्या भागातून चीनी सैन्य माघारी जाऊ लागल्याने भारताची आग्रही भूमिका फलदायी ठरल्याचे सूचित होत आहे.