चिंचवड – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 81 टक्के भरले आहे. मात्र, शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. चिंचवड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. तसेच नियमित पाणीपुरवठा देखील होत नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करून महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. आजमितीला पवना धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पाऊस जोरदार पडत आहे. तरी, देखील शहरातील अनेक भागात सुरळीत पाणी पुरवठा
होत नाही. स्थानिक नागरिक मोतीलाल पाटील म्हणाले, शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड परिसरात गेल्या आठ दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.
पाणी नियमित येत नाही. पवना धरण 81 टक्के भरले आहे. नद्या, नाले, ओढे वाहत आहेत. मात्र, शहरातील नागरिकांनी पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नाही, हे दुर्दैव आहे. महापालिकेने सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.