बीजिंग- करोनाने जगभरात साडेदहा लाखांच्या आसपास बळी घेतले आहेत. कोट्यवधी लोक बाधित आहेत. एकट्या अमेरिकेत दोन लाखांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर करोनाचे उगमस्थळ असलेल्या चीनने आता शहाणपण शिकवण्याचा राग सुरू केला आहे.
अमेरिकेची जर भूमिका अशीच निष्क्रिय राहीली आणि जागतिक सामुदायिक प्रयत्नांना जर अमेरिकेचा असाच विरोध कायम राहीला तर करोनाला अटकाव करणे अवघड असेल असे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
करोनाने अमेरिकेत आतापर्यंत गेलेल्या बळींचा आकडा हा कोरिया युध्दात आणि इराक युध्दात मरण पावलेल्यांपेक्षाही जास्त झाला आहे. मात्र यातल्या अनेक जणांचे प्राण वाचवले जाउ शकले असते. आपल्या विरोधी आणि निष्क्रिय भूमिकेची जबाबदारी अमेरिकेला घ्यावी लागेल.
जर आपसांतल्या समस्या सुटल्या नाहीत आणि जागतिक स्तरावर करोनाचा तोडगा निघाला नाही, तर आणखी लाखो नागरिकांना यात मृत्यूमुखी पडावे लागेल असा इशाराही या दैनिकाने दिला आहे.
त्यात पुढे म्हटले आहे की जगात आज प्रचंड लोकसंख्या असूनही करोनावर नियंत्रण मिळवणारा चीन एकमेव देश आहे. आपली समस्या काय आहे, शत्रू कोण आहे, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या शत्रुचा मुकाबला करण्यासाठी वैश्विक स्तरावर एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. असे असूनही करोनाचा उद्रेक झाला असताना अमेरिकेकडून त्यात अडथळे आणले गेले. त्यामुळे आरोग्य समस्येवर राजकारणाचा प्रभाव पडला व लाखो लोकांना त्याचे मूल्य चुकवावे लागले.
करोना विरोधातील लढ्यात अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन पूर्णत: अपयशी ठरले आहे. प्रादुर्भाव वेगाने होत असताना त्यावर लक्ष देण्याऐवजी अमेरिका जगात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. आताही जगात सगळ्यांत जास्त झळ भारताला आणि नंतर अमेरिकेला बसणार असल्याचा अनुमान अनेक लोकांनी व्यक्त केला आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
करोनावर आपण निश्चितच विजय मिळवू यात शंका नाही. मात्र त्याचे मूल्य काय असेल. दहा लाखांच्या वर लोक आज मरण पावले आहेत. कदाचित हा आकडा 20 ते 30 लाखांच्या घरातही पोहोचू शकतो असा इशारा देण्यात आला आहे.