बीजिंग – चीन आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील अन्य देशांमध्ये मतभेद पसरवणे थांबवा, असे चीनने आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांना उद्देशून म्हटले आहे. पॉम्पेओ आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क ईस्पर सध्या 2+2 चर्चेसाठी भारत दौऱ्यावर आहेत. या चर्चेदरम्यान भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या संरक्षण भागीदारी विषयक संबंध अधिक बळकट केले जाणार आहेत.
या दौऱ्यात चीनच्या विस्तारवादी धोरणाला विरोध करण्याबरोबरच अमेरिका आणि भारत दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये भारत-प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य अबाधित राख्ण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याच्या मुद्दयावर सहमती झाली आहे. या पार्श्वभुमीवर चीनकडून हा इशारा देण्यात आला.
पॉम्पेओ यांनी चर्चेनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान चीनच्या विस्तारवादी धोरणावर जोरदार टीका केली होती. या बद्दल “पॉम्पेओ यांचे चीनवरचे आरोप आणि टीका नवीन नाही.’ अशा शब्दात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वॅंग वेन्बीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपातून शीतयुद्ध भडकत ठेवण्याची मानसिकताच दिसून येते आहे. ही मानसिकता सोडून द्यावी. चीन आणि अन्य देशांदरम्यान मतभेद पसरवणे बंद करावे आणि प्रादेशित स्थैर्य आणि शांतता धोक्यात आणू नये, अशी पॉम्पेओ यांना सूचना आहे, असेही वेन्बीन म्हणाले.
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासमवेत अमेरिका-भारत दरम्यानच्या 2+2 चर्चेच्याच्या तिसऱ्या फेरीसाठी अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांच्यासमवेत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पेओ सोमवारी भारतात आले. भारतातील चर्चेनंतर पॉम्पेओ आणि ईस्पर श्रीलंकेला आणि मालदिवला जाणार आहेत.