नवी दिल्लीः हिंदी महासागरात दिवसेंदिवस चीनची घुसखोरी वाढत असल्याचे दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांनी चीनबाबत चिंता व्यक्त केली आहे. भारतीय लष्कराला चीनला सडेतोड उत्तर देण्याची गरज आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) इतर विभागांत मोठ्या प्रमाणात नौदलाचे साहित्य पाठवत आहे. त्यावर भारताला नजर ठेवणे आवश्यक आहे. चीनच्या मंत्रालयानं सैन्याच्या विकासासाठी नव्या युगातील चीनची राष्ट्रीय सुरक्षा या मथळ्याखाली एक श्वेतपत्रिका जारी केली आहे. यात वर्ष 2012 ते 2017 पर्यंत चीनच्या संरक्षण क्षेत्रातील खर्चात सरासरी 9.42 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे.
आफ्रिकेच्या हॉर्नमधल्या जिबुतीमध्ये ओव्हरसीज बेस स्थापण करणे आणि कराचीमधल्या नौसैनिकांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याबरोबरच चीनच्या हिंदी महासागरात होत असलेल्या घुसखोरीला दुर्लक्ष करणे भारतासाठी धोकादायक ठरू शकते. चीनने या हिंदी महासागरालगतच्या क्षेत्रात सहा ते आठ युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे भारताने सतर्क राहण्याची गरज आहे. आपल्याला चीनच्या हालचालींवर अतिशय काळजीपूर्वक नजर ठेवावी लागणार आहे. चीनने काढलेली फक्त श्वेतपत्रिका नसून ग्लोबल पॉवर बनण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. त्यामुळेच ते नौसेनेला मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा पुरवठा करत आहेत. त्याकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन आपल्या बजेटमधून त्याला उत्तर देता येऊ शकते का हे पाहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.