वॉशिंग्टन – चीनने भारताच्या विरोधात आक्रमण केले. त्यातून त्यांच्या सत्ताधाऱ्यांची नेमकी मानसिकता स्पष्ट होते आहे, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रीएन यांनी
म्हटले आहे. चीनने भारताच्या गलवान खोऱ्यात आक्रमण करून भारताच्या 20 जवानांना ठार मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रतिपादन केले आहे.
हा भारत आणि चीन यांच्यातील आपसातला वाद आहे, पण त्यातून चीनचे खरे स्वरूप स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. भारताच्या विरोधातील त्यांची कृती रानटीपणाची होती, अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
फॉक्स रेडिओला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मतप्रदर्शन केले. चीनने आज हॉंगकॉंगच्या संबंधात घेतलेली भूमिका, त्यांची दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेली अरेरावी, त्यांचे तैवानला धमकावणे, या
साऱ्या घटनांतून चीनच्या सत्ताधाऱ्यांच्या मनात नेमके काय चालले आहे याचीही कल्पना येते,असे ते म्हणाले.
चीनने आज दक्षिण चीन समुद्रातील 1.3 दशलक्ष चौरस मैल भागावर आपली मालकी असल्याचे भासवले आहे. त्या भागात एक कृत्रिम बेट तयार करून त्यांनीतेथे लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न चालवला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्यांच्या या साऱ्या हालचाली चिंता वाढवणाऱ्या आहेत,असेही ते म्हणाले. कालच अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने आपले दक्षिण चीन समुद्राविषयीचे धोरण स्पष्ट करताना चीनची तेथे दादागीरी चालवू दिली जाणार नाही,असे स्पष्ट केले आहे.