बीजिंग- करोनावर लस तयार करण्याचे जगभरात प्रयत्न सुरू आहेत. विषाणूच्या दहशतीमुळे सगळेच अत्यंत वेगाने केले जात आहे. मात्र अति घाई संकटात नेई असा प्रकार या लशीच्या बाबतीत होणार नाही ना, असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे.
हा प्रश्न पडायचे कारण असे की चीननेही लस तयार केली आहे. त्याचा सरसकट वापर करण्याची परवानगी अद्याप देण्यात आलेली नाही. याचा अर्थ सुरक्षेचे सगळे मानक अद्याप पूर्ण झाले नसावेत. मात्र तत्पूर्वीच आपत्कालीन स्थितीत उचलली जातात तशी पाउले उचलत लस देण्याचा प्रकार सुरू असल्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे.
याबाबत एक तर्क दिला जातो आहे. तो म्हणजे चीनमध्येच करोनाचा उगम झाला. तो आता तेथून जवळपास हद्दपार झाला आहे. नवे रूग्ण सापडत नसून दाखल झालेले बहुतांश रूग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी करोनाचा पुन्हा शिरकाव होण्याचीही भीती आहे. त्याकरताच नवे बाधित सापडू नये म्हणून लस आपात्कालीन स्थिती समजून दिली जात असल्याचे तेथील सूत्रांचे म्हणणे आहे.
एका व्यक्तीने याबाबत सांगितलेला अनुभव पुरेसा आहे. त्यातून सुरक्षेचे निकष पडताळून पाहणे किती आवश्यक आहे याची खात्री पटते. लस दिल्यानंतर कार चालवत असताना आपल्याला एकदम सूस्ती आली. मद्यप्राशन करून आपण कार चालवत आहोत, असेच मला वाटू लागले. सुरक्षित ठिकाणी कार थांबवली. थोडा वेळ तेथे विश्राम केल्यावर पुढचा प्रवास सुरू केल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे.
हजारो व्यक्तींना लस दिली गेली आहे. त्यात असे प्रकार अगदी थोड्याच व्यक्तींसोबत झाले आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही तज्ञांचे म्हणणे आहे.
करोना लशीच्या संदर्भात चीनने आणखी एक वेगळा प्रयोग केला. त्यांनी लशीच्या चाचण्या सुरू करण्या अगोदर आपले संशोधक आणि बडे अधिकाऱ्यांनाच ही लस दिली. ज्या कंपन्या लसनिर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी आहेत, त्यांच्या बहुतेक कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांनाही लस दिली गेली आहे. अन्य कंपन्याही आता हाच कित्ता गिरवत आपापल्या कर्मचाऱ्यांना लस देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नैतिकतेच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही या बाबी योग्य नसल्याचे चीनमधील जाणकारांचेच म्हणणे आहे.