बीजिंग – सगळ्या जगाला हैराण करणाऱ्या करोनावर भारतानं लस शोधली. या घडीला भारतात निर्माण झालेली लस शेजारच्या मित्रराष्ट्रांसाठीही वरदान ठरते आहे. भारताने शेजारच्या अनेक देशांनाही लसीचा पुरवठा सुरू केला आहे. पण त्यामुळे चीनचा चांगलाच तीळपापड झाला आहे. त्यामुळेच भारताला गुंतवून ठेवण्याचे आणि बदनाम करण्याचे प्रयत्न त्या देशाकडून सुरू झाले आहेत.
चीनच्या लसीच्या चाचण्या बांग्लादेशमध्ये स्थगित करण्यात आल्याची बातमी तेथील सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सनेच दिली आहे. पण त्याचं खापर मात्र चीननं भारतावर फोडलं आहे. भारतानं पडद्यामागून हस्तक्षेप करत चीनच्या सायनोव्हॅक लसीच्या चाचण्या बांग्लादेशात थांबवल्याचं चीनी सरकारी वृत्तपत्रानं म्हटलं आहे. विशेष म्हणजे गुरुवारपासून बांग्लादेशात भारतानं दिलेल्या कोव्हिशिल्डचं लसीकरण सुरु झाले असून त्यामुळे चीनचा आणखीनच जळफळाट झाला आहे.
जानेवारीच्या सुरुवातीला भारताने दोन लसींच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली. तेव्हापासून आतापर्यंत आपल्या शेजारच्या सहा लहान राष्ट्रांना कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकच्या लसी निर्यात करण्यात आल्या. महत्वाचं म्हणजे भूतान, श्रीलंका, बांग्लादेश सारख्या देशांना भारतानं मैत्री खातर सुरुवातीचे डोस भेट म्हणून दिलेत. भारताच्या या व्हॅक्सिन डिप्लोमसीमुळे दक्षिण आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या चीनच्या मनसुब्यांना हादरा बसलाय.