नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चीनच्या अतिक्रमणाबाबत मौन का बाळगून आहेत, असा सवाल कॉंग्रेसने गुरूवारी केला. मोदी सरकार राष्ट्रीय सुरक्षेबाबत तडजोड करत असल्याचा आरोपही त्या पक्षाने केला.
कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पत्रकार परिषदेत चीनच्या अतिक्रमणावरून मोदी सरकारला धारेवर धरले. उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांवरून चीनने डोकलामजवळ चार गावे वसवल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनने तब्बल 100 चौरस किलोमीटर जमीन बळकावली आहे. काहीच न करता चीनचे अतिक्रमण खपवून का घेतले जात आहे? मोदींनी देशातील जनतेला उत्तर द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनीही ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. चीनचे अतिक्रमण भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हादरा आहे. ते अतिक्रमण मे ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत घडले आहे. तरीही मोदी मौन का बाळगून आहेत? राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी कुणाची, अशा प्रश्नांची सरबत्ती सुर्जेवाला यांनी केली.