नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यावर हक्क सांगण्याचा चीनचा दावा भारताने फेटाळून लावला. असे अतिशयोक्त आणि अस्वीकारार्ह दावे हे सहा जून रोजी लष्कराच्या उच्चस्तरीय चर्चेतील समझोत्याच्या नेमके विसंगत आहेत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
चिनी लष्कराने बुधवारी गलवान खोरे हा आमचाच भाग असल्याचा दावा केला होता. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या प्रवक्त्याने हा दावा केला होता. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या समझोत्याच्या नेमक्या उलटा हा दावा आहे. असे त्यांनी रात्री एक वाजता जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांत सोमवारी रात्री धुमश्चक्री उडाली होती. भअरताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चीनच्या भूमिकेचा कडक शब्दांत धिक्कार केला होता.