नवी दिल्ली : जगात एकीकडे कोरोनाचा हाहाकार सुरु आहे तर दुसरीकडे चीनच्या नसत्या कुरापती सुरु झाल्या आहेत. भारत आणि चीन दरम्यानच्या नियंत्रण रेषेवर चीनच्या सैनिकांकडून मुजोर वर्तन करण्यात येत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. पूर्व लडाखच्या काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. चीनने इथे मोठ्या प्रमाणात सैन्याची तैनाती सुद्धा केली आहे. पण आता दोन्ही बाजुंनी थोडी नरमाईची भूमिका घेतली असल्याची माहिती समोर येत आहे.
नियंत्रण रेषेवर संघर्षाची स्थिती असलेल्या एका भागामध्ये दोन्ही देशांचे सैनिक थोडे मागे हटले आहेत. गालवान व्हॅलीमध्ये चिनी सैन्य दोन किलोमीटर तर भारतीय सैनिक एक किलोमीटर मागे हटले आहेत. इंग्रजी वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे.
येत्या सहा जूनला दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरलमध्ये चर्चा होणार आहे. त्यापूर्वी थोडे नरमाईचे संकेत देण्यात आले आहेत. पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेल्या तणावावर मार्ग काढण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल. आतापर्यंत झालेल्या सर्व बैठका निष्फळ ठरल्या आहेत. चीनने नियंत्रण रेषेवर मोठया प्रमाणात सैन्याची जमवाजमव करुन ठेवली आहे तसेच चीनच्या फायटर विमानांचा सरावही या भागामध्ये सुरु असतो. भारतावर दबाव वाढवण्याच्या चीनच्या रणनितीचा हा भाग आहे.
भारताने आतापर्यंत प्रत्येक वेळी चीनच्या या दादागिरीला त्याच भाषेत उत्तर दिले आहे. भारताकडून १४ कॉर्प्सचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंह चिनी लेफ्टनंट जनरल बरोबर चर्चा करणार आहेत. भारतीय लष्करातील सूत्रांनी ही माहिती दिली. पँगाँग टीएसओ तलावाचा भाग या चर्चेमध्ये मुख्य मुद्दा असेल. तलावाजवळच्या फिंगर फोर एरियामध्ये चिनी सैन्याने तळ ठोकला आहे.