बीजिंग, दि. 14- करोनाच्या संकटकाळात चीनने भारताला एक मोठा झटका दिला आहे. चीनी पुरवठादारांनी कोविडशी संबंधित वस्तूंच्या किंमती 5 पटींनी वाढवल्या आहेत. इतकेच नाही तर औषधांचे अनेक कॉन्ट्रॅक्टही रद्द केले आहेत. चिनी पुरवठादारांनी भारतात पुरवठा होणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या किमतीत 5 पटींनी वाढ केली आहे.
यापूर्वी मागील वर्षी चीनने व्हेंटिलेटर्सच्या किमती वाढवल्या होत्या. यावेळी मात्र चीनने फक्त किमती वाढवल्या नाहीत तर औषधांच्या पुठवठ्याचे अनेक करार रद्द केले आहेत. चिनी वृत्तपत्र साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार चीन सरकारी उड्डाणांवरही बंद घालत आहे. ज्यामुळे भारतातला लागणाऱ्या गरजेच्या वस्तुंचा पुरवठा होणार नाही.
हॉन्गकॉंगमधील भारताचे काऊन्सिल जनरल प्रियंका चौहान यांनी चीनच्या या कृत्याचा विरोध दर्शवला आहे. पुरवठ्याच्या या साखळीबाबत चीनने असा निर्णय करायला नको होता. चीनच्या या कृत्यामुळे पुरवठ्याची साखळी बाधित होईल आणि कोविडशी संबंधित गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडतील, असे प्रियंका चौहान यांनी म्हटले आहे.
चीनने हे पाऊल उचलल्यामुळे कोविडशी संबंधित अनेक वस्तूंच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. 200 डॉलर किमतीच्या 10 लीटर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ची किंमत 1 हजार डॉलरवर पोहोचली आहे. तर चिनी वृत्तपत्रांच्या म्हणण्यानुसार चीनच्या फार्मा पुरवठादाराने अचानक करार रद्द केले आहेत.
आता चीनमधील फार्मा पुरवठादार रेमडेसिविर आणि फेव्हिपिराविर अशा औषधांचा कच्चा माल लिलावाद्वारे विकत आहेत. तर चीन सरकारने सिच्युआन एअरलाईनच्या भारतातील 10 शहरांमधील उड्डाणावर बंदी आणली आहे. त्यामुळे भारताच्या अडचणी अजून वाढणार आहेत.