बीजिंग – करोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चहूबाजूंनी चीनवर आरोप होत असतानाही चीनकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. लडाख सीमेवर चीनचा भारताबरोबर वाद सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला त्यांनी तैवानलाही हल्ल्याची धमकी दिली आहे. तैवानला एकीकरणाचा प्रस्ताव मान्य नसेल, तर तैवानवर थेट हल्ला करू, अशी धमकी चीनने दिली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, तैवानला स्वतंत्र होण्यापासून आम्हाला रोखता आले नाही, तर चीन थेट हल्ला करेल, असा इशारा चीनच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे सदस्य आणि जॉईंट स्टाफ विभागाचे प्रमुख ली झुओचेंग यांनी दिला आहे.
ली झुओचेंग हे चिनी सैन्यात वरिष्ठ जनरल पदावर आहेत. चीनमध्ये इतक्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीने असे विधान करणे अत्यंत दुर्मीळ बाब आहे. बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ द पब्लिक येथे शुक्रवारी ली झुओचेंग यांनी हे आक्रमक विधान केले.
ली झुओचेंग म्हणाले, शांततेने एकीकरणाचे मार्ग बंद झाले, तर चीनचे सैन्य संपूर्ण देशाला सोबत घेऊन बंडखोरांवर कारवाई करेल. सैन्याचा वापर न करण्याचा आम्ही कुठलाही शब्द दिलेला नाही. तैवानमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही हा पर्याय राखून ठेवला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यपदी त्साई ईंग वेन यांची जानेवारीत दुसऱ्यांदा निवड झाली. त्यावेळी त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट चीनला इशारा दिला होता. चीनने तैवानबद्दलच्या कठोर धोरणांचा फेरविचार करावा. तैवान एक स्वतंत्र देश आहे. चीनने तैवानवर हल्ला केला, तर त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्साई ईंग वेन यांनी दिला होता.