बीजिंग – गलवान खोऱ्यानंतर पँगाँग सरोवर परिसरातही चिनी सैन्यांकडून नियंत्रण रेषा बदलण्याचा प्रयत्न झाल्यानंतर भारताने-चीन दरम्यानचा तणाव चांगलाच वाढला आहे. सीमेवर चिनी सैनिकांच्या कुरापती सुरु असतानाच काल (बुधवारी) नवी दिल्लीतून चीनवर पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राईक करण्यात आली. भारताने काल पबजी या लोकप्रिय गेमिंग अॅपसह 118 चिनी अॅप्सवर बंदी घालत असल्याचा निर्णय जाहीर केला.
यानंतर भारताच्या निर्णयावर चीनकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
भारताच्या कारवाईचा विरोध करत चिनी वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते जी. फेंग (Gao Feng) यांनी, “मोबाइल अॅप्सवर भारताने घातलेली बंदी चिनी गुंतवणूकदार आणि सेवा पुरवठादारांच्या कायदेशीर हितांचं उल्लंघन आहे. चीन या मुद्द्यावर गंभीर असून भारताने आपली चूक सुधारावी”, असं वक्तव्य केलं.
याबाबतचं वृत्त नामांकित वृत्तसंस्था Reuters ने दिल आहे.
तत्पूर्वी, सरकारने याबद्दल जारी केलेल्या माहितीत म्हटले की, माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे विविध गटाकडून या संदर्भात तक्रारी येत होत्या. ऍपमधील माहितीची साठवणूक भारताबाहेर केली जाते. ग्राहकांची ही माहिती अनेक वेळा अयोग्य कामाकरिता वापरली जाते. यासाठी बऱ्याच ग्राहकांनी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे तक्रारी केल्या होत्या. भारतीय ग्राहकांच्या या माहितीचा दुरुपयोग झाल्यास त्याचा भारतीय एकात्मतेवर आणि सार्वभौमत्वावर परिणाम होऊ शकतो. यासाठी तातडीने अशा ऍपवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बंदी घालण्यात आलेल्याअॅप्समध्ये पब्जीशिवाय बैदूू, कॅमकार्ड, कट कट, राईज ऑफ किंगडम, झॅक झॅक, बैदूू एक्सप्रेस, टॅन्सेट वॉचलिस्ट, फेस यू, वुई चॅट रीडिंग, टॅन्सेंट वेयूॅ या ऍपचा समावेश आहे. त्याचबरोबर पब्जी लाईटवरही बंदी घालण्यात आली आहे. भारताच्या सार्वभौमत्त्वाच्या दृष्टीकोनातून आगामी काळातही अशा प्रकारची कार्यवाही करण्याची शक्यता सरकारने खुली ठेवली आहे.