-डॉ. शैलेंद्र देवळाणकर
आज संपूर्ण जगाची डोकेदुखी बनलेले दोन देश आहेत. एक चीन आणि दुसरा पाकिस्तान. यातील चीनने आक्रमक विस्तारवादाचे धोरण स्वीकारत अनेक देशांविरुद्ध कुरघोड्या सुरू केल्या आहेत, त्यांच्या भूभागांवर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे.
ज्या पद्धतीने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ऍडॉल्फ हिटलरने फ्रंट उघडल्या होत्या तशाच पद्धतीने चीनच्या शी जिनपिंग यांनी भारत, तैवान, हॉंगकॉंग, जपान, दक्षिण पूर्व आशियाई देशांविरुद्ध आक्रमक धोरण अवलंबले आहे. इंग्लंडच्या राजदूतांनी नुकतेच चीनच्या या आक्रमक विस्तारवादाविषयी बोलताना असे म्हटले आहे की, चीनने हॉंगकॉंग, तैवान, भारतातील लडाख आदी क्षेत्रांमध्ये ज्यापद्धतीने घुसखोरी सुरू केली आहे त्यामुळे जागतिक सुरक्षितता आणि शांतता धोक्यात आली आहे. म्हणूनच चीनसारख्या देशाविरुद्ध संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे, पाकिस्तान हा देश दहशतवादाची फॅक्टरी बनलेला आहे. जगामध्ये दहशतवादाची निर्यात करणारा देश म्हणून या देशाची ओळख झालेली आहे. आज संयुक्त अरब आमिरातीसारखा इस्लामिक देश मंगळावर यान पाठवत आहे आणि तेलातून मिळालेला पैसा संशोधनासाठी खर्च करत आहे; त्याच वेळी पाकिस्तान मात्र आयएमएफ आणि वर्ल्ड बॅंकेकडून मिळणारा पैसा दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणासाठी आणि त्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी रसद पुरवण्यासाठी, दहशतवादी संघटना पोसण्यासाठी खर्च करत आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानबाबत एकंदरीत जागतिक जनमत प्रक्षुब्ध झाल्याचे दिसत आहे.
जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या या दोन देशांनी आणखी एक भीषण कारस्थान रचल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार, पाकिस्तानमध्ये जैविक अस्त्रे (बायोलॉजिकल वेपन्स) तयार करण्यासाठी चीन मदत करणार असल्याचे समोर आले आहे. भारत आणि पश्चिमी राष्ट्रांना उद्ध्वस्त करण्यासाठी हे महाविनाशकारी षड्यंत्र रचले गेले असल्याचे अँथोनी क्लान यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि पाकिस्तानातील डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनायजेशन (डेस्टो) यांच्यात याबाबत एक गोपनीय करार झाल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे यासाठीचा सर्व खर्च चीनकडून करण्यात येणार आहे.
चीनकडून अशा प्रकारच्या विनाशक कारवायांसाठी पाकिस्तानला वर्षानुवर्षांपासून मदत केली जात आहे. पाकिस्तानच्या अण्वस्त्र विकास कार्यक्रमाच्या विकासामध्ये चीनची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. चीनमध्ये 1964 मध्ये अण्वस्त्रांची चाचणी करण्यात आली. 1968 नंतर पाकिस्तानने अण्वस्त्र बनवण्यास सुरुवात केली. यासाठी आवश्यक असणारी माहिती व तंत्रज्ञान चीनने त्यांना पुरवले. एम 11 सारखे क्षेपणास्त्र चीनने पाकिस्तानला दिले आहे. त्यामुळे पाकिस्तानला लष्करी मदत, आण्विक मदत आणि आर्थिक मदत देण्यासाठी चीन सदैव आघाडीवर राहिला आहे. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर या प्रकल्पांतर्गत 60 अब्ज डॉलर्स चीनने पाकिस्तानात गुंतवलेले आहेत. या मदतीने आता नवे विघातक रूप धारण केले आहे. हे रूप आहे जैविक अस्त्रांचे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले होते आणि त्यानंतर जगानंतर अणुबॉम्बच्या विध्वंसकतेची प्रचिती आली. तशाच प्रकारे करोनामुळे एखादा विषाणू अत्युच्च भराऱ्या घेणाऱ्या जगाला कशा प्रकारे जराजर्जर करू शकतो हे कळून चुकले आहे. करोना विषाणू हा संपूर्णतः कृत्रिम असून तो नैसर्गिक नाहीये, यासंदर्भातील अनेक अहवाल गेल्या तीन-चार महिन्यांत समोर आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेतूनच करोनाचा उगम झाला आहे, असे मत जगभरातीलच अनेक तज्ज्ञांनी-शास्त्रज्ञांनी मांडले आहे.
खुद्द चीनच्या या प्रयोगशाळेतील डॉक्टरांनीही याबाबतचे खुलासे केले आहेत. वटवाघुळ किंवा खवल्या मांजरामधून जर हा विषाणू पसरला असल्याचे चीनकडून सांगितले जात असले तरी नुकत्याच आलेल्या एका अहवालाने हे साफ खोटे असल्याचे म्हटले आहे. वुहानमधील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीमध्ये अशा प्रकारचे 150 महाविघातक विषाणू तयार असल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर संशोधन सुरू असून यासंदर्भातील सर्व माहिती आणि तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याजोगे आहे. अर्थातच, हे हस्तांतरण चीनकडून आपल्या “ऑल वेदर फ्रेंड’ पाकिस्तानला केले जात असल्याची दाट शक्यता आहे.
याचे प्रमुख कारण म्हणजे, सध्या संपूर्ण जगाचे लक्ष वुहानमधील या प्रयोगशाळेकडे आहे. त्यामुळे चीनला या प्रयोगशाळेतून जैविक अस्त्रे आणि विषाणू हलवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी चीनकडे दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरा उत्तर कोरिया. यासाठी पाकिस्तान हा चीनसाठी अधिक सोयीचा आहे. कारण चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाखाली पाकिस्तानचे सार्वभौमत्वही चीनकडे गहाण असल्याची स्थिती आहे. त्यामुळे जगाचे लक्ष जोपर्यंत चीनकडे आहे तोपर्यंत हे सर्व विषाणू पाकिस्तानमध्ये नेणे चीनच्या हिताचेच आहे. कारण आज अमेरिका आणि चीनमधील संघर्ष कमालीचा वाढला आहे.
कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडते की काय, अशी स्थिती आहे. अमेरिकेने चीनविरोधातील आक्रमकता कमालीची तीव्र केली आहे. अशा वेळी जर करोना आणि वुहानचे संबंध असल्याचे ठोस पुरावे मिळाले किंवा करोनाच्या उगम आणि विकास, प्रसारामध्ये चीनचा हात असल्याचे पुरावे मिळाले तर चीन प्रचंड अडचणीत येऊ शकतो. प्रसंगी जागतिक समुदायाकडून आर्थिक निर्बंधही चीनवर लादले जाऊ शकतात. त्यामुळेच चीनने पाकिस्तानचा आसरा घेत आपले हित जपण्याचा प्रयत्न केलेला असू शकतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, पाकिस्तानने जर या विषाणूंच्या माध्यमातून महासंहारक जैविक अस्त्रे तयार केली तर ती चीनलाही वापरता येऊ शकतात. तथापि, ही जैविक अस्त्रे किंवा विषाणू पाकिस्तानात असण्याने जगाची चिंता कमालीची वाढली आहे. याचे कारण पाकिस्तानातील सरकार अत्यंत कमकुवत आहे. तेथे कोणत्याही क्षणी धार्मिक क्रांती होईल किंवा लष्करी राजवट येईल अशी स्थिती आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील अण्वस्त्रांबाबत जागतिक समुदायाकडून भीती व्यक्त केली जात होती.
अमेरिकेने 16-17 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक पाकिस्तानात करण्यामागे तेथील अण्वस्त्रांची सुरक्षितता हेच प्रमुख कारण होते. ही अण्वस्त्रे एखाद्या दहशतवादी संघटनेच्या हाती पडतील आणि त्याचा गैरवापर होऊन जगाला त्याची प्रचंड मोठी किंमत मोजावी लागू शकते, अशी भीती असतानाच हा अहवाल समोर आला आहे.
पाकिस्तानातील सद्यस्थिती आणि चीनसोबतचा हा करार यामुळे भारताची चिंता प्रचंड वाढली आहे. कारण पाकिस्तान याचा वापर भारताविरुद्ध करण्यासाठी आतुरलेला आहे. अमेरिका, ब्राझीलनंतर आज करोनाबाधितांच्या संख्येमध्ये भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताला नुकसान पोहोचवण्यासाठी अण्वस्त्रांपेक्षाही प्रभावी अस्त्र जैविक अस्त्र आहे याची जाणीव चीन आणि पाकिस्तानला आहे. नुकत्याच झालेल्या लडाखमधील संघर्षकाळातही पाकिस्तान आणि चीन दोघे एकत्रितरित्या भारताविरोधात तयार होते, किंबहुना आहेत.