नवी दिल्ली – लडाखमध्ये थंडीच्या घसरलेल्या पाऱ्यामुळे चीनने सीमेवरून एक पाऊल मागे घेतले आहे. भारत आणि चीनमध्ये लडाखच्या सीमेवर तणाव असतानाही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरुन (एलएसी) चीनने तब्बल 10 हजार सैनिक मागे हटवले आहेत. भारतीय सीमेच्या 200 किमी परिसरातून चीनी सैनिकांनी माघार घेतली आहे.
पूर्व लडाखमध्ये सध्या तापमान शून्य अंशाच्या खाली गेले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सीमेजवळ जेथे चिनी सैनिक सराव करायचे, त्या जागेवर आता कोणीही दिसत नाही. गेल्या वर्षी भारत-चीन सीमेवर झालेल्या तणावानंतर चीनने 50 हजार सैनिक येथे तैनात केले होते. मात्र रक्त गोठवणाऱ्या थंडीत चिनी सैन्याने माघार घेतली आहे.
दरम्यान कडाक्याच्या थंडीत चिनी सैन्य मागे हटले असले तरी, भारतीय सैन्य जीवाची पर्वा न करता सीमेवर देशाचे रक्षण करण्यासाठी तळ ठोकून आहे. कडाक्याच्या थंडीचा फायदा घेऊन चिनी सैन्याने घुसखोरी करू नये, म्हणून भारतीय सैनिक सीमेवर खडा पहारा देत आहेत.