तिरूपुर – चीन दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत असून त्यांनी भारताची अधिकाधिक भूमी व्यापण्यास सुरूवात केली आहे तरीही देशशचे नेतृत्व करणाऱ्या 56 इंची छातीच्या नेत्याचे चीनचे नावही घेण्याची हिंमत नाही अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी सध्या तामिळनाडुच्या दौऱ्यावर असून आज दुसऱ्या दिवशी तेथे बोलताना त्यांनी ही टीका केली.
ते म्हणाले की हे सरकार शेतकऱ्यांचे, छोट्या व्यावसायिकांचे किंवा मध्यम उद्योजकांचे नाही. हेच लोक उद्याचा भारत घडवत असतात पण त्यांच्या विषयी सरकारला अजिबात आस्था नाही. देशाच्या सीमाही आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत असे नमूद करून ते म्हणाले की, हजारो चिनी सैनिक भारतीय हद्दीत घुसले आहेत हे आपण सर्व पहात आहोत.
पण सरकार त्या देशाविषयी तोंडून चकार शब्दही काढायला तयार नाही. चीनचे नावही घेण्याची त्यांची हिंमत होत नाही. ही आजची स्थिती आहे. तामिळनाडू आणि तामिळी लोकांची एक स्वतंत्र संस्कृती असून या संस्कृतीचा सैनिक होण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. भारतीय जनता पक्ष तामिळनाडुची हीच संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे पण आपण तसे होऊ देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.