लडाख : चीनी सैनिकांचा 5 मे रोजीही आपल्या जवानांशी संघर्ष उडाला होता. त्यावेळी त्यांच्याकडे लोखंडी सळ्या, काटेरी जाळी बसवलेल्या काठ्या, चाकू होते. मग तरीही यावेळी आपले सैनिक नि:शस्त्र का गेले, असा सवाल लडाख पर्वतीय विकास परिषदेचे माजी अध्यक्ष रिगजीन स्पालबर यांनी केला. त्याचबरोबर चीन आपल्या भूमीत राजरोस घुसखोरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
तुम्ही सीमेवर काय पाहाता. चीन आपली भुमी गिळंकृत करत आहे, हा इशारा आम्ही वेळोवेळी देत आहोत. यावेळी त्यांनी जास्तच मुसंडी मारली. पॅनगॉंग टीसोच्या पिंगर आठपर्यंत आपले जवान गस्त घालतात. चीनी पिंगर चार पर्यंत केवळ आले नाहीत तर त्यांनी तेथपर्यंत रस्ताही बांधला आहे. हीच स्थिती गलवान नाल्यापाशीही आहे. त्यामुळे दौलतबेग आल्डी रस्ताही त्यांच्या टापुत आला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कारगील भागातील आमदार असगर अली करबाली यांनीही स्पलाबार यांचीच री ओढली. चीनी लोक लडाखमधील भूमी 40 वर्षे बळकावत आहेत. पुर्वी इंचा इंचाने घुसायचे आता किलोमिटर्सने जागा बळकावत आहेत. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरिडोर झाल्यापासून हा भाग ते आक्रमकपणे बळकावत आहेत. न्योमा गटप्रमुख उग्रेन चोनदोन यांनी चीनी सैन्याच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील हालचालींची छायाचित्रेच फेसबुकवर अपलोड केली आहेत. तशी गांग भागात चीनच्या घुसखोरीकडे त्यांनीच सर्वात आधी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, मी फेसबुक पोस्ट केल्यानंतर यामुळे घबराट पसरत असल्याचे सांगणारा मला फोन आला. त्यामुळे त्या पोस्ट मी डिलीट केल्या.
पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव ही नेहमीची स्थिती आहे. ज्यावेळी तुम्ही तुमच्या सीमा ठामपणे निश्चित केलेल्या नसतात त्यावेळी अशा घटना अपरिहार्य असतात. अस्पष्ट सीमांचे उल्लंघन होऊ शकते, मात्र चीनने ते जाणीवपूर्वक केले आहे, असे काश्मिरातील विश्लेषक जाफर चौधरी यांनी सांगितले.