नवी दिल्ली – भारत आणि चीनदरम्यान झालेल्या द्विपक्षीय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय पातळीवर झालेल्या चर्चेनुसार आता दोन्ही देश लडाखमधील सीमेवरुन (एलएसी अर्थात लाईन ऑफ अक्च्युअल कंट्रोल) सैन्यकपात करणार आहेत. या निर्णयावर मागील आठवड्यात शिक्कामोर्तब झाले होते. त्यानुसार ही कार्यवाही होणार असल्याची माहिती उभय देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांच्या सूत्रांनी दिली आहे.
दोन्ही देश पूर्व लडाखच्या पॅंगॉन्ग लेक परिसरातून आपापले सैनिक परत घेण्यास तयार झाले आहेत. भारत आणि चीन न दिवसांपर्यंत दररोज 30% सैनिकांना परत बोलावणार आहेत. एकूण तीन टप्प्यांमध्ये सैनिक परत येतील. ताज्या करारानुसार दोन्ही देशांचे सैनिक एप्रिल-मेमध्ये तैनात केलेल्या पोझिशनवर परत येतील. गलवान घाटीमध्ये 15 जूनला सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक हाणामारीनंतर दोन्ही देशांनी आपले हजारो सैनिक सीमेवर तैनात केले होते.
6 नोव्हेंबरला चुशूलमध्ये कमांडर लेव्हलच्या बातचीत मध्ये डिसइंगेजमेंटवर चर्चा झाली. भारताकडून परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव आणि डायरेक्टरेट जनरल ऑफ मिल्ट्री ऑपरेशन ब्रिगेडीयर घई चर्चेमध्ये सामील झाले होते.
एक आठवड्यापर्यंत झालेल्या बातचीत नंतर ठरले की, ही मूव्हमेंट तीन टप्प्यात होईल. यानुसार, पहिल्या टप्प्यात रणगाडे, लष्करी वाहने आणि सैनिकांना सीमेपासून ठरलेल्या अंतरावर नेले जाईल. दुसऱ्या टप्प्यात पॅंगॉन्ग लेकच्या उत्तरेकडील तीरापासून सलग तीन दिवस दररोज 30 टक्के सैनिक परत बोलवले जातील. यानंतर भारतीय सैनिक आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह धन सिंह थापा पोस्टजवळ येतील. तर, चीन फिंगर 8 च्या आपल्या आधीच्या पोझिशनवर जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही देशांना पॅंगॉन्ग तलावाजवळील दक्षिण भागासोबतच चुशूल आणि रेजांग लाच्या आसपासचा परिसर सोडावा लागेल.
सैनिक परत येत असताना दोन्ही देश यावर देखरेख ठेवतील. यासाठी दोन्ही देश सोबत मिळून एक मॅकेनिज्म बनवण्यास तयार झाले आहेत. यात एकमेकांसोबत बातचीत करण्यासह लक्ष्य ठेवण्यासाठी मानवरहीत हवाई वाहन (अनमॅन्ड एरियल व्हेईकल (UAV) चा वापर करतील.