वॉशिंग्टन, दि. 6 – चीन सीमेवर आहे तीच स्थिती कायम ठेऊन शांतता प्रस्थापित करण्याचे भारताने सातत्याने प्रयत्न केले आहेत; पण चीनला त्याविषयी जराही आपुलकी नाही, त्यांनी भारतापुढे तेथे आव्हानात्मक स्थिती निर्माण करून ठेवली आहे, असे निरीक्षण अमेरिकेचे दक्षिण अशियाचे निरीक्षक ऍशले टेलिस यांनी नोंदवले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारताने तणाव टाळून समतोल साधण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत; पण चीनने त्या प्रयत्नांना अजिबातच किंमत दिलेली नाही.
भारताने जम्मू काश्मीरच्या संबंधात अंतर्गत स्वरूपात काही निर्णय घेतला आहे तथापि भारताचा हा निर्णय म्हणजे चीनला प्रक्षोभित करणारा प्रकार वाटतो आहे. त्यांनी तसा समज करून घेऊन हिमालयाच्या बाजूकडील भागात आपले नियंत्रण अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यामुळे भारताला तेथे अवघड निर्णय घेण्याची स्थिती उद्भवली आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
चीनचा प्रभाव वाढत असून त्याचे प्रत्यंतर त्यांनी भारताला दाखवायला सुरुवात केली आहे. आता भारताला अशियातील अन्य शक्तींच्या बरोबर चीनच्या विरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा पर्याय स्वीकारावा लागणार आहे, असे निरीक्षणही टेलिस यांनी नोंदवले आहे. जम्मू काश्मीरच्या जवळ पूर्व लडाख मध्ये उंचीवरच्या प्रदेशात चीनने अतिक्रमण केले आहे. त्यांना तेथूनच भारताच्या विरोधात लष्करी कारवाया करायच्या आहेत असे हे संकेत आहेत. भारताने जोपर्यंत निकराचा लढा देऊन चिनी आक्रमणाला तेथून हटवण्याचा पर्याय स्वीकारण्याची भूमिका घेतली नाही तर भारताच्या भूमीवर तेथे कायम स्वरूपी कब्जा करण्याचा चीनचा प्रयत्न आहे असेही त्यांनी म्हटले आहे