बीजिंग – भारताच्या सीमेवरील स्थिती “स्थिर आणि नियंत्रणा’त असल्याचे चीनने सोमवारी म्हटले आहे. चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांकडे “अडथळारहित’ संपर्कमाध्यम असल्याचेही चीनने नमूद केले आहे.
दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान चिनी विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजान यांनी ही टिप्पणी केली आहे.
दोन्ही देशांच्या नेत्यांदरम्यान निर्माण झालेल्या सर्वसंमतीला चीन लागू करत आला आहे. चर्चा आणि संवादाच्या माध्यमातून या प्रकरणी तोडगा काढला जाण्याची अपेक्षा असल्याचे झाओ यांनी म्हटले आहे.
भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या टिप्पणीशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरादाखल झाओ यांनी हे विधान केले आहे. सीमा मुद्दयावर भारत स्वतःच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचू देणार नसल्याचे राजनाथ म्हणाले होते. सीमा वाद शांततेच्या मार्गाने सोडविण्यासाठी चीनशी चर्चा करत असल्याचे भारताने सांगितले होते.
लडाख आणि सिक्कीम क्षेत्रात भारत तसेच चीनच्या सैन्यादरम्यान अनेक आठवडयांपासून तणावाची स्थिती आहे. पॅगोंग त्सो सरोवर क्षेत्रात 5 मे रोजी दोन्ही देशांचे सैनिक लोखंडी सळी आणि काठयांसह परस्परांना भिडले होते. यादरम्यान दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान दगडफेकही झाली होती.
या घटनेत दोन्ही देशांचे अनेक सैनिक जखमी झाल्याचे वृत्त होते. सिक्कीम येथील नाकू ला खिंडीनजीकही दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत किमान 10 सैनिक जखमी झाले होते.