नवी दिल्ली- भारत आणि चीन यांच्या सीमेवरील स्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, तेथील काही घटनांनंतर दोन्ही देशांतील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या आहेत. त्यातून बरेचसे मुद्दे सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही चर्चेची प्रक्रिया सुरू असून त्यातून सारे मुद्दे निकाली निघतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
चीनने लडाखच्या पॅंगॉंग तलावाच्या परिसरात घुसखोरी केली असून तलावात चीनच्या मोटार बोटींची गस्त सुरू आहे. त्या भागात चिनी लष्कराच हेलिकॉप्टर्सही गस्त घालत असल्याचे वृत्त आहे. या तलावापासून 200 किमी अंतरावरील चीनच्या हवाई तळावर चार लढाऊ विमाने तैनात असल्याचे उपग्रह छायाचित्रातून स्पष्ट झाले आहे.
सिक्कीम राज्यातील भारतीय हद्दीतही चीनने घुसखोरी असल्याचे लक्षात आल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हा वाद सोडवण्यासाठी लष्करी अधिकारी पातळीवर चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही बाजूंमध्ये चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या असून लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी काल संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन त्यांना तेथील स्थितीची कल्पना दिली आहे. त्यानंतर आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. पूर्व लडाखमधील किमान पाच भागात भारत आणि चीन यांचे लष्कर एकमेकांच्या विरोधात आक्रमक भूमिकेत आहे.