संयुक्तराष्ट्र सुरक्षा मंडळात काश्मीर विषयावर पाठिंबा देण्याची दिली ग्वाही
नवी दिल्ली – काश्मीर प्रश्नावर रशियाने भारताची पाठराखण केल्याची बातमी यायच्यावेळेलाच चीनने या बाबतीत पाकिस्तानची बाजू उचलून धरली आहे. हा विषय पाकिस्तानने संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात नेल्यास तेथे पाकिस्तानची पाठराखण करण्याचा शब्द चीनने त्यांना दिला आहे. पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी हे सध्या चीन दौऱ्यावर गेले असून त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर चीनने ही घोषणा केली आहे.
चीनच्या विदेश मंत्रालयाने या चर्चेनंतर जे अधिकृत निवेदन प्रसिद्धीला दिले आहे त्यात त्यांनी काश्मीर वरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाविषयी चिंता व्यक्त केली आहे. काश्मीर प्रश्न हा ब्रिटीश राजवटीची देन आहे.
तो संयुक्तराष्ट्रांच्या ठरावानुसार, सुरक्षा मंडळात निश्चीत केलेल्यासंबंधीत बाबींनुसार आणि दोन्ही देशांतील आपसातल्या समझोता करारानुसार सोडवला जावा. या विषयावर एकतर्फी निर्णय घेतल्याने स्थिती अत्यंत गुंतागुंतीची बनते त्यामुळे असे निर्णय एकतर्फी घेतले जाऊ नयेत असेही त्यांनी म्हटले आहे.
चीनचे विदेश मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेबद्दल आणि चीनने दिलेल्या प्रतिसादाबद्दल पाकिस्तानचे विदेश मंत्री शाह मेहमुद कुरेशी यांनी समाधान व्यक्त केले आहे.