मुंबई – ‘राजा शिवछत्रपती’ या मालिकेतील अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका ही अजरामर ठरली. आजही लोक ती मालिका आवर्जून सोशलमिडीयावर बघतात. या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून बाहेर पडून ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून अमोल कोल्हे यांनी संभाजी राजे यांची भूमिका साकारली. संभाजी महाराजांचा संपुर्ण जीवनप्रवास या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न कोल्हे यांनी केला.
दरम्यान, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेने आता महत्वाचं वळण घेतलं आहे. मालिकेत संभाजी राजेंवर शत्रू चालून येतात हा अखेरचा टप्पा दाखवण्यात येत असून, या प्रसंगाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत साऱ्यांवरच या क्षणाचा ताण आहे.
याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हेंनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते म्हणाले कि, “आज मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका माझ्या घरी चला… नाहीतर ते तुम्हाला पकडतील… मी निशःब्द कृतकृत्य!” असं कोल्हे म्हणाले.