चिंबळी-येथे कधीच वीज वितरण कंपनीचे घरगुती व शेती पंपाचे बिल वेळेवर वेळेत मिळत नाही. त्यामुळे बिल वेळेत भरले जात नाही. अशा त्रासामुळे चिंबळी (ता. खेड) येथील नागरिक महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आहेत.
सकाळी वीज गेल्यास ती थेट सायंकाळीच येते. दिवसभर कामे रखडून राहतात कधी कधी तर मध्यरात्री वीज जाते. विद्युत कर्मचाऱ्याला फोन लावल्यास तो बंद असतो किंवा लागलाच तर काम चालू असल्याचे सांगितले जाते. मुळात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असेल तर त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यात महावितरणला यश का येत नाही? सकाळी वीज गेली तर सायंकाळीच येते, असे कसले मोठे काम सुरू असते ते नागरिकांना दिसून येत नाही.
कंपन्यामध्ये किंवा एखाद्या गोडावूनमधून वीज गेली तर विद्युत कर्मचारी त्यासाठी धावपळ करतात; मात्र गावातील रहिवासी भागातील वीज गेल्यास दिवसभर नागरिक संपर्क साधत असतात, तरीही काम तात्काळ होत नाही. या मागे काय कारण की कसले अर्थकारण? दडले आहे का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. विद्युत कर्मचारी याबाबत नेहमी या भागात मोठ्या प्रमाणात रहदारी वाढल्याचे सांगतात. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिकचा ताण रोहित्रावर येतो. यामुळे फ्यूज उडतात, रोहित्राची मागणी करूनदेखील ते लवकर मंजूर होत नाही. यामुळे महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते.
मुळात कनेक्शन मागणी वाढली असली तर त्यासाठी आवश्यक तो साहित्य पुरवठा महावितरणनेच करायचा. एखाद्या कंपनीमध्ये किंवा गोडावूनमध्ये तात्काळ रोहित्र उपलब्ध होते; पण गावासाठी म्हटले की रोहित्र मागविले आहे असे कारण मिळते. यामुळे महावितरणच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहे.
- पूर्वी तक्रारी कमी होत्या
सध्याच्या वीज व्यवस्थेकडे पाहून चिंबळीकर यापूर्वी तरी चांगली व्यवस्था होती, असे सांगतात. सध्याची कार्यपद्धती गोडावूनवाल्यांच्या फायद्याची झाली असून त्यांना लूटणारी आहे. गावाच्या कामाकडे सोयीने पाहिले जात आहे. कोणी तक्रार केल्यास कामांचा लोड असल्याचे सांगितले जाते. मुळात दिसवभर वीजच मिळत नसेल तर नक्की नागरिकांनी बिले तरी का भरायची? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.