नंदुरबार – कांद्याने रडवल्यानंतर आता मिरची सर्वसामान्य जनतेला ठसका बसवणार आहे. नंदुरबार जिल्हा हा मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने यंदा मिरचीचे उत्पादन कमी होणार आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्यामुळे मिरचीचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरवरर्षी नंदुरबार जिल्ह्यात मिरचीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. मात्र यंदा अतिवृष्टीने मिरचीच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यातच भर म्हणून यावर्षी मिरचीवर बुरशीजन्य आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या दुहेरी संकटांमुळे यावर्षी मिरची उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हं आहेत.
जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने तेरा एकर क्षेत्रावर मिरचीची लागवड केली होती. दरवर्षी त्यांना त्यातून तीनशे क्विंटलचे उत्पादन होत होते. मात्र, यावर्षी अतिवृष्टी आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे तब्बल 70 टक्के उत्पादन घटले आहे. शेतीसाठी गुंतवलेलं भाडवल देखील निघणे अशक्य असल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे.