दूरदृष्टी असलेल्या वडिलांमुळे मुलांचे जीवन बनले सुखकर
वडिलांनी घेतली मुलांच्या शिक्षण, लग्नापर्यंत येणाऱ्या खर्चाची जबाबदारी
हव्या त्या पालकाकडे मुलांना जाता, राहता येणार
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – पती-पत्नीतील तुटणाऱ्या नात्यांचा फटका अनेकदा मुलांना बसतो. दोघांच्या भांडणात मुलांची फरफट झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, एका दाव्यात पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पतीने दाखल केलेल्या दाव्यात घटस्फोट झाला. मात्र, तरीही उच्चशिक्षित आयटी क्षेत्रातील या पित्याने दोन्ही मुलांची जबाबदारी अंगावर घेतली आहे. त्यामुळे मुलांचे भविष्य सुखकर बनले आहे. विशेष म्हणजे इतके सर्व उघड झाल्यानंतरही त्याने पत्नीसाठीही आर्थिक तरतूद केली आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित आणि आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. दोघांचा विवाह 15 वर्षांपूर्वी थाटामाटात झाला आहे. दोघांनी सुखानी संसार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्यांना दोन मुले झाली. त्यानंतर मात्र एक अनिष्ट घटना घडली. पत्नीचे एका प्रतिष्ठित व्यक्तीसोबत अनैतिक संबंध जुळले.
काही कालावधीनंतर ते त्याच्या निदर्शनास आले. त्याने ऍड. सुनीता जंगम यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर दोघांचे समुपदेशन करण्यात आले. यात दोघांत समझोता झाला. दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांना 12 आणि 10 वर्षांची दोन मुले आहेत. या मुलांना भविष्यात शिक्षण अथवा करिअरच्या इतर बाबीत त्रास होऊ नये, यासाठी पतीने वेगळे झाले तरीही, मुलांच्या उच्चशिक्षणाची आणि लग्न होईपर्यंत ज्या जबाबदाऱ्या, खर्च येतील, त्या पार पाडण्याचे स्वत:हून कबूल केले. त्याच्या संपत्तीतील काही वाटा पत्नीलाही दिला. मुलांवर कोणताही निर्णय लादलेला नसून, ज्या पालकाकडे वाटेल, त्या पालकाकडे दोघांना राहता येणार आहे. कधीही कोणत्याही पालकांना भेटता येणार आहे.
…त्यामुळे दोघे एकत्र येऊन शकले नाहीत
समुपदेशानात दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी काहीकाळ दोघांना पुन्हा एकत्र राहण्यास सांगितले होते. मात्र, या कालावधीत तो घडलेला प्रकार विसरू शकला नाही. तिच्यामध्येही फारशी सुधारणा झाली नाही. त्यामुळे दोघे एकत्र येऊ शकले नाहीत.
बऱ्याचदा अशा नाजूक कौटुंबिक प्रकरणात मुलांना वेठीस धरले जाते. त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होते. अवहेलना होते. कालांतराने दुसरे लग्न केल्यानंतर दोन्ही पालकांचे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. मात्र, या प्रकरणात वडिलांनी मुलांच्या भवितव्याची जबाबदारी घेऊन, एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेषकरून त्यांचा विचार झाल्याने दोन्ही मुलांनी आई-वडिलांच्या घटस्फोटाचा निर्णय सकारात्मकपणे स्वीकारला आहे. वडिलांच्या निकोप मनोवृत्तीमुळे पती, पत्नी, दोन्ही मुले अशा चौघांचे आयुष्य सुखकर बनले आहे.
– ऍड. सुनीता जंगम, सचिव, दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन