कोल्हापूर – करोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांना काही नातेवाईक आपलेसे करत नसल्याचे समोर येत आहे. मात्र, कोल्हापुरातील कणेरी येथील सिद्धगिरी मठाने अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या पालनपोषण, शिक्षण ते वैवाहिक जीवनपर्यंतचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत मठाचे काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी माहिती दिली आहे.
करोनामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवले आहे. अशा मुलांना मायेचा आधार कोल्हापुरातील कणेरीवाडीतील सिद्धगिरी मठ देणार आहे. करोनामुळे ज्या मुलांच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांना सिद्धगिरी मठ दत्तक घेऊन त्यांच्या पालन-पोषणासह शिक्षणाचा व लग्नापर्यंत सर्व खर्च करणार आहे. महाराष्ट्रभरातील सर्वांसाठी हा उपक्रम आहे. राज्यातील अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांची सर्व जबाबदारी सिद्धगिरी मठ घेणार असल्याची माहिती मठपती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी दिली.
अनेकांचे आईवडिलांचा यात मृत्यू झाला. मात्र, अनेक नातेवाईक अशा मुलांना सांभाळून घेण्यासाठी नकार देत आहेत. केवळ संस्कार कमी पडल्याने ही समस्या गंभीर बनत चालली आहे. आताचे लोक आधी आपले मग दुसऱ्याचे असा विचार करू लागल्याने लोकभावना विचारत घेत नसल्याचे चित्र आहे.
त्यामुळे ही समस्या लक्षात घेऊन हा उपक्रम राबवत असल्याच स्वामीजींनी सांगितले. ज्या मुलांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आहे, अशा मुलांच्या नातेवाईकांनी कणेरी येथील सिद्धगिरी मठाशी संपर्क साधवा, असे आवाहन स्वामीजींनी केले आहे.