शहरातील एक वर्षाच्या चिमुकलीला गमवावे लागले प्राण : बाधितांमध्ये प्रमाण 9.45 टक्के
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक झाला आहे. करोनाने शहरातील एक हजाराहून अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. तसेच काही तरुणांनाही या आजारामुळे प्राण गमावावे लागले आहेत. परंतु गेल्या चार महिन्यांमध्ये लहान मुलांचा मृत्यू झाला नव्हता. यामुळे पिंपरी-चिंचवड शहर हे करोनाच्या बाबतीत शून्य बालमृत्यू असलेले राज्यातील एकमेव शहर ठरले होते. परंतु आता एका खासगी रुग्णालयात करोनामुळे एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता लहान मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने 46 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. तर मृतांची संख्याही हजारीपार गेली आहे. सर्वाधिक मृत्यू हे 60 हून अधिक वय असलेल्या रुग्णांचा झाला आहे. तसेच मृतांमध्ये 22 ते 39 वर्षाच्या तरूणांचाही समावेश आहे. तर आता चिमुकल्यांच्या जीवावर करोना उठला आहे. पिंपरीतील डॉ. डी वाय पाटील रुग्णालयामध्ये एका एक वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात 4072 चिमुकल्यांना करोनाची लागण झाली आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी याचे प्रमाण 9.45 टक्के आहे. त्यामुळे चिमुकल्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर गर्दी दिसू लागली आहे. ज्येष्ठ नागरिकांसोबतच लहान मुलेही बाहेर फिरत आहेत. शहरात एकाही लहान मुलाचा करोनाने मृत्यू न झाल्याने अनेकांचा असा गैरसमज झाला की करोनामुळे लहान मुलांना धोका नाही. परंतु गेल्या चार महिन्यांमध्ये शहरातील शून्य ते बारा या वयोगटातील चार हजाराहून अधिक मुलांना करोनाची लागण झाली आहे.
लहान मुलांमध्ये सद्यस्थितीत करोनाचे प्रमाण कमी आहे. मात्र निर्बंध उठल्यावर यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या लहान मुलांना शॉपिंगसाठी कुठे बाहेर नेऊ नये. सोसायटीमध्ये मुले खेळण्यासाठी जात असतील तर त्यांना मास्क लावूनच पाठवावे. खेळत असताना सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी. विनाकारण लहान मुलांना बाहेर घेऊन फिरू नये. मृत झालेली मुलगी वायसीएममध्ये दाखल नव्हती. फक्त करोनाने लहान बाळांचा मृत्यू होणार नाही. त्या मुलीला इतर आजार असण्याची शक्यता आहे. लहान मुले बाधित होऊ नये, यासाठी पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
– डॉ. दीपाली अंबिके, बालरोगतज्ज्ञ वायसीएम रुग्णालय.