नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट जवळपास आटोक्यात आल्याचे चित्र आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवला जात आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे जानकारांकडून सांगण्यात येत आहे. असे असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. करोनाची तिसरी लाट जरी आली तरी लहान मुलांना धोका नसल्याची माहिती एका सर्वेद्वारे देण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने केलेल्या सिरो सर्वेक्षण केले आहे. यातून दिलासादायक निष्कर्ष समोर आले आहेत. यामध्ये देशभरात विविध ठिकाणांवर लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले असून काही ठिकाणी हे प्रमाण ५० ते ८० टक्क्यांदरम्यान आहे.
या मुलांना कोरोना संसर्ग झाल्यानेच त्यांच्यात अँटीबॉडीज तयार झाल्या असून आता तिसरी लाट आली तरी देखील त्याचा लहान मुलांना फारसा धोका असणार नाही. असे या सर्वेक्षणातून निष्कर्ष काढण्यात आले आहे. या सर्वेक्षणासाठी दहा हजार व्यक्तींची तपासणी करण्यात आली होती. त्यातील केवळ चार हजार ५०९ नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले होते. देशातील विविध भागात हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
यासंदर्भात माहिती देताना ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, प्रौढांच्या तुलनेत लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये संसर्गाचे प्रमाण ५५.७ टक्के, तर लहान मुलांमध्ये हे प्रमाण ६३.५ टक्के आहे. देशात बहुतांश भागांमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला मात्र ते लक्षात आले नाही. बहुतांश मुलांना त्याचा त्रासही झाला नाही. ज्या मुलांना त्रास झाला त्यांना सहव्याधीचा त्रास असल्याचे ते म्हणाले.
देशभरात अनेक लहान मुलांना याआधीच कोरोना होऊन गेला असून त्यातून ते बरेही झाले आहेत, त्यामुळे त्यांना परत संसर्ग होण्याची शक्यता कमीच आहे, असे हे सर्वेक्षण सांगते. पुढील लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोरोनाचे गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता कमीच आहे. अँटीबॉडीजमुळे त्यांना संरक्षण मिळू शकते, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.