सोलापूर – सोलापुरातील ज्येष्ठ लेखिका आणि 20 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विजया श्रीनिवास जहागीरदार यांचे बुधवारी निधन झाले. त्या 88 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
विजया जहागीरदार यांचा जन्म 12 सप्टेंबर 1932 रोजी इंदोर येथे झाला. त्यांनी विविध विषयावर पन्नास वर्षांहून अधिक काळ लेखन केले. कवयित्री म्हणून त्यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. आकाश मोगरा, स्त्री नक्षत्र, रातवा, गीत गीता, कल्पवृक्षाची फळे, गीत मेघदूत – शाकुंतल हे त्यांचे काव्यसंग्रह गाजले.
बालसाहित्यातील त्यांचे योगदानही फार मोलाचे आहे. सुगंध, भिरभिरं, टीम टिम टिकली, निर्मळ कहाण्या, मोहराचं झाड, एकदा असं झालं आणि इतर कथा हे सर्व बालकथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मनोरंजन विज्ञान या विषयावरदेखील त्यांनी विपुल लेखन केले आहे. लहान मुलांसाठी विजयाताईंनी अनेक कविता लिहिल्या. यामध्ये फुलबाजा, फजितवाडा, मखमली झुला, छुम छुम गाणी, खडीसाखरेचे वेल, हिरकण्या, जा बै आई, डिंग डिंग डिंगांग असे कवितासंग्रह बालवाचकांना भुरळ पाडून गेले.
विजया जहागीरदार यांनी केलेल्या विपुल बालसाहित्याची दखल घेऊन त्यांची सोलापूर येथे झालेल्या विसाव्या अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्या बालकुमार साहित्य मंच या संस्थेच्या अध्यक्षादेखील होत्या. विजयाताईंनी लिहिलेल्या कर्मयोगिनी पुस्तकाला मध्यप्रदेश साहित्य अकादमीचा भा. रा. तांबे पुरस्कार मिळाला होता. “लपाछपी’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार, हिरकण्या व भिरभिरं या साहित्यकृतीनाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता.