“करोना’ची दहशत : शाळांना सुट्टी देण्यात आल्याने बच्चे कंपनी खूश
पिंपरी – “करोना’च्या दहशतीखाली संपूर्ण देश आला आहे. “करोना’मुळे शाळांना मिळालेल्या सुट्ट्यांमुळे मात्र लहान मुले भलतीच खुश दिसत आहेत. परस्पर विरोधी असणारे हे चित्र सध्या पिंपरी-चिंचवड शहरातील घरा-घरामध्ये दिसून येत आहे.
परीक्षांमुळे मार्च महिना खरेतर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने तणाव देणारा ठरत असतो. परीक्षा जवळ आली आहे, अभ्यासाला बसा अशी वाक्य विद्यार्थ्यांना या काळात सतत ऐकावी लागत असतात. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेचे वेळापत्रक दिले होते. त्यानुसार मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परिक्षेला सुरुवात होणार होती. मात्र, “करोना’ व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अचानक सुट्ट्यांचा शासन निर्णय आल्यामुळे परीक्षा होणार की नाही किंवा पुढे ढकलणार याबाबत सगळीच अनिश्चितता आहे.
सीबीएसी बोर्डाच्या काळी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपले असून त्यांना सुट्ट्याही लागल्या आहेत. तर काही शाळांच्या परीक्षा संपत आल्या असून, अवघे एक-दोन विषयाचे पेपर बाकी आहेत. त्यामुळे, उरलेले एक-दोन पेपर कधी होणार? याबाबतही पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
कर्नाटक राज्य सरकारने तेथील शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेतला होता. तेथील इयत्ता पहिली ते सहावीच्या शासकीय, विनाअनुदानित, अनुदानित आणि इतर शाळांमधील परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, मागे झालेल्या परीक्षेच्या आधारावर विद्यार्थ्यांना उतीर्ण करुन जून मध्ये होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळेला येण्याचे आदेश कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने नुकतेच दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याकडेही असे होऊ शकते का? अशी चर्चाही पालकांमध्ये रंगत आहे.
स्कूल बस चालकांसाठी थोडी खुशी, थोडा गम
शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय झाल्यामुळे स्कूल बसचालकही सध्या आनंदी आहेत. काही स्कूलबस चालक प्रथम सत्र किंवा द्वितीय सत्राचे शुल्क एकदम घेत असतात. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झालेला नाही. महिन्याच्या शेवटी फीस घेणाऱ्या वाहनचालकांचे उतन्न मात्र काही दिवसांसाठी रखडले आहे. त्यामुळे, स्कूलबस चालकांमध्ये थोडी खुशी, थोडा गम दिसत आहे.
शिक्षण मंडळाने 31 मार्च पर्यंत शाळा बंद
ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर परिस्थितीचा आढावा घेवून 31 मार्च नंतर काय करायचे ते ठरवले जाईल. पुढील काही दिवसात करोनाची नेमकी स्थिती असेल, यावर सगळे आवलंबून असले.
राज्य शासन तसेच शिक्षण मंडळाने सध्यातरी याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे, सध्या तरी एप्रिलमध्ये परीक्षा होणार की नाही? याबाबत आताच काही सांगता येणार नाही.
– पराग मुंडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक