भगतसिंग कोश्यारी स्नेहभोजनासाठी “मातोश्री’वर
मुंबई : भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात सत्ता स्थापनेसाठी मुदत मागणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टिका केली होती.
मात्र, सत्ता स्थापनेनंतर झाले गेले विसरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांसाठी गुरुवारी रात्री “मातोश्री’वर स्नेहभोजन आयोजित केले होते. मुख्यमंत्र्यांचे आमंत्रण स्विकारत राज्यपालही स्नेहभोजनासाठी वांद्रे येथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांच्या या डिनर डिप्लोमसीमुळे राजकिय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत.
भाजपापासून फारकत घेत शिवसेनेने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. राज्यपालांच्या निमंत्रणावरून शिवसेनेच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन सत्ता स्थापनेसाठी दोन दिवसांची मुदत मागितली होती. मात्र, राज्यपालांनी त्यास नकार दिला होता.
राष्ट्रवादीचे बंडखोर अजित पवार यांच्यासोबत भाजपाने सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट उठवली होती. तेव्हा राज्यपालांनी दोन दिवस कशाला मी तुम्हाला सहा महिने देतो अशाप्रकारे राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा केला होता.